महाराष्ट्र संवाद न्यूज
कोविड कालावधीनंतर वर्क फ्रॉम होम आणि विद्याथ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती व त्यातून कळत-नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो, असे प्रतिपादन संगणक तज्ज्ञ वैशाली खैरनार यांनी केले.
दत्त विद्यालय, जवळे कडलग येथे ‘सायबर क्राइम’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, व्यासपीठावर मुख्याध्यापक सूर्यकांत सुर्वे , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य भास्करराव शेळके उपस्थित होते.
खैरनार म्हणाल्या, आपले चुकून पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल केल्याची धमकी दिल्यास किंवा तसे केल्यास त्याविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. त्यासाठी ३ ते ७ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा होते. फेक अकाउंटचा वापर करून महिला आणि मुलींची बदनामी केली जाते. स्पाय अॅपपासून सावधानता बाळगा. स्पाय अॅपमुळे कोणीही कोणाच्याही मोबाइलचा पूर्ण ताबा घेऊ शकतो, तसेच त्या मोबाइलला वरील सर्व माहिती बघू शकतो. अगदी आलेले गेलेले कॉल्स, मेसेज, व्हॉट्सअॅपचे मेसेज, फोटो, व्हिडिओ, लाइव्ह रेकॉर्डिंग आदी स्पाय अॅप मोबाइलमध्ये टाकण्यासाठी काही सेकंद पुरेसे असतात.
त्यामुळे आपला मोबाइल थोडा वेळही कोणाच्या ताब्यात देऊ नये. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास, बँक खाते किंवा सोशल मीडिया हॅक झाल्याची शंका असल्यास, तसेच कोणीही ऑनलाइन धमकी दिल्यास त्वरित सायबर पोलिसांत तक्रार करणे गरजेचे असते. जेवढे लवकर आपण पुढे येऊ, तेवढे लवकर सायबर गुन्ह्यांना आळा बसू शकेल. याशिवाय स्पाय अॅपबद्दल अधिक माहिती, त्याचा दुरुपयोग, त्यातून होणारे गुन्हे आणि कायदा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
वृषाली कडलग म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सायबर साक्षर झाल्यास भविष्यातील अनर्थ टळू शकतील. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. समाज माध्यमांचा संयत वापर करायला हवा. सोशल मीडिया वापरू नये किंवा तो वाईटच आहे, असे नाही; पण तो आपण नक्की कशासाठी आणि किती वेळ वापरायचा, हे कळायला हवे. सततचे स्क्रोलिंग, विद्वेष, झुंडशाही, गॉसिप आणि नकारात्मकतेपासून दूर राहायला जमले तर इथून खूप काही शिकता येते.
सिद्धी वाकचौरे, प्रदिप कडलग, समिक्षा देशमुख, संस्कृती लावरे, साहिल ढगे यांनी विचारलेला प्रश्नांना वैशाली खैरनार यांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक सूर्यकांत सुर्वे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अनिल वाकचौरे यांनी तर आभार प्रदर्शन हौशीराम सोनवणे यांनी केले. याप्रसंगी दशरथ मांडे, संजय कानवडे, स्नेहलता कडलग आदी उपस्थित होते.

