महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर
यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महसूलमंत्री विखे पाटील यांनी मंगळवारी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात अतिवृष्टी आणि गारपीटीने नूकसान झालेल्या गावात जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.अतिवृष्टीने प्रत्येक पीकाचे किती क्षेत्र बाधीत झाले याची आकडेवारी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाकडून जाणून घेतली. तसेच पंचानाम्याचा आढावाही घेतला. मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष डाळींब कांदा टोमॅटो या पीकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.

या नूकसानीच्या ठिकाणी जावून मंत्री विखे पाटील यांनी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देवून या संकटात शासन तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. राज्य सरकारने आजपर्यत झालेल्या सर्वच नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.

यासाठी एनडीआरफचे नियम आणि निकष सुध्दा बदलले. शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्यासाठी असलेली मर्यादासुध्दा वाढवली असल्याचे सांगून आता मदतीसाठी सततचा पाऊससुध्दा ग्राह्य धरण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. आजच्या दौऱ्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा अनुदानाच्या बाबतीत नव्याने काही सूचना दिल्या असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्याकरीता नैसर्गिक आपतीची आतापर्यत २७० कोटी रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, उर्वरीत मदत येत्या काही दिवसात मिळणार आहे. संगमनेर तालुक्याकरीता झालेल्या नूकसानीपोटी ६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. नव्याने बाधीत झालेल्या पीकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासन मदतीचा निर्णय करेल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची खात्री शेतकऱ्यांना आम्ही बांधावर जावून देत असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.

