संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज
विविध भाषा, वेशभूषांच्या या देशांमध्ये संविधानाने सर्वांना एकत्रित ठेवले आहे. संविधानाचे तत्व जपण्याचे प्रत्येकाची जबाबदारी असताना काहीजण मात्र या राज्यघटनेच्याच तत्त्वाच्या विरुद्ध विचार मांडत आहे. आपसात जातीभेद निर्माण करून राजकारण केले जात आहे. एका विशिष्ट समाजाचे राज्य निर्माण करण्यासंदर्भातील विधाने दुर्दैवी असून सर्वांचा विकास आणि समता असलेला राज्यघटनेचा विचार शाश्वत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम, कुसुम माघाडे, सुधाकरराव रोहम, सुरेश थोरात, हिरालाल पगडाल, विश्वास मुर्तडक, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी, सिताराम राऊत, प्रा. शशिकांत माघाडे, ॲड. अमित सोनवणे, दलित पॅंथरचे राजू खरात, प्रवीण गायकवाड, रवींद्र गिरी, प्रकाश वाघमारे, संदीप दळवी आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, चातुर्वर्ण व्यवस्थेविरोधात सर्वप्रथम गौतम बुद्धांनी लढा दिला. त्यांचा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. संत महात्म्यांचे समानतेचे विचार, तत्त्वज्ञान त्यांनी राज्यघटनेत एकत्र करून देशाला संविधान दिले. या विचाराला ताकद द्यावी लागेल. काळ कठीण आहे. संघर्ष करावा लागेल. देशासाठी आपण लढतो आहोत, म्हणून समतेचे तत्त्वज्ञान असलेल्या विचारांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे भारतरत्न डॉ. आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू आहे.
डॉ तांबे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब, दलित, शोषितांच्या उद्धारासाठी केला. संविधानाच्या आधारावरील लोकशाहीमुळेच सर्वांसाठी विकासाच्या वाटा खुल्या झाल्या. इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा विविध विषयांचे गाढे अभ्यासक असलेल्या आंबेडकरांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, समाज विकासासाठी शिक्षणाचा मूलमंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारावे. यावेळी उत्कर्षा रुपवते, श्रीकांत माघाडे, सुधाकर रोहम, बी. आर. कदम यांची भाषणे झाली. प्रास्ताविक विनय घोसाळे यांनी सूत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी तर प्रा. शशिकांत माघाडे यांनी आभार मानले.
तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, यशोधन जनसंपर्क कार्यालय, जोर्वे, राजापूर, वडगाव पान यांसह संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती साजरी करत अभिवादन करण्यात आले.
पुस्तक प्रदर्शन व रक्तदान शिबिर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित जयंती महोत्सवात विविध विषयांच्या पुस्तकाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते तसेच यावेळी रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदानही केले.

