संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
जलजीवन मिशनच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा एका बालिकेच्या जीवावर बेतला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम सुरू आहे. खोदलेल्या चारीतील पाण्यात पडून सात वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. मधुबाला शाम साळुंखे (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.
एकीकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शुक्रवारी (ता.१४) दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नारायण जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधुबाला ही नारायण जगन्नाथ पवार यांचे नात असून ते त्यांच्याकडे आलेली होती.

जलजीवन मिशनचे निळवंडे येथे काम सुरू असून यासाठी संबंधित ठेकेदाराने चारी खोदून ठेवली आहे. खोदलेल्या चारीमध्ये पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्याने चारीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. याकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष न दिल्याने या चारीमध्ये असलेल्या पाण्यात मधुबाला श्याम साळुंखे ही बालिका पडली. चारीतील पाण्यात ती बुडाली.
ग्रामस्थांनी तिला तातडीने फुलेवाडी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे निळवंडे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासन संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एल. एम. औटी करत आहेत.

