महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरच्या अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजकुमार गांधी यांची तर उपाध्यक्षपदी आनंद दरडा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष कांतीलाल गांधी, उपाध्यक्ष प्रितेश पारख यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम उपनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. यासाठी सोमवारी सहकार अधिकारी ए. एस. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी आणि उपाध्यक्षपदासाठी आनंद दरडा यांनी आपले अर्ज दाखल केले होते.

अध्यक्षपदी राजकुमार गांधी व उपाध्यक्षपदी आनंद दरडा या दोघांच्याही निवडी बिनविरोध पार पडल्या. अध्यक्षपदासाठी राजकुमार गांधी यांचे नाव नंदनमल बाफना यांनी सुचविले. तर वैभव ढोरे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी आनंद दरडा यांचे नाव मावळते अध्यक्ष कांतीलाल गांधी यांनी सुचविले. तर मावळते उपाध्यक्ष प्रितेश पारख यांनी अनुमोदन दिले. नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने लक्षवेधी कामगिरी केली होती. आर्थिक वर्षात सुमारे साडेतीन कोटींचा नफा या संस्थेला झाला होता.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी संस्थेचे संचालक कांतीलाल गांधी, प्रितेश पारख, नंदनमल बाफना, सुमतीलाल भंडारी, महेश पितळे, सचिन धाडीवाल, छाया बोगावत, सुनिता पिपाडा, वैभव ढोरे, अशोक नारायणे, दिलीप मैड हे संचालक व शाखा व्यवस्थापक गणेश ठाकरे उपस्थित होते.
संस्थेच्या आर्थिक जडणघडणीमध्ये सभासदांसह संचालकांनी मोठे योगदान दिले आहे. खातेदार, कर्जदार, ठेवीदारांनी यामुळे संस्थेवर विश्वास दर्शविला असून या पार्श्वभूमीवर नवे पदाधिकारीदेखील तेवढ्याच सक्षमतेने काम करणार असल्याचा विश्वास अध्यक्ष राजकुमार गांधी उपाध्यक्ष आनंद दरडा यांनी व्यक्त करण्यात आला. नव्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

