महाराष्ट्र संवाद न्यूज
पालक हे मुलांचे प्रथम शिक्षक तर शिक्षक मुलांचे दुसरे पालक असतात. नीती मूल्यांची नैतिक शिकवण देत परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, असे प्रतिपादन देवगड विद्यालयाचे मावळते मुख्याध्यापक रमेश पावसे यांनी केले.
33 वर्षाच्या शैक्षणिक सेवेनंतर मुख्याध्यापक पावसे सेवानिवृत्त झाले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयामध्ये आयोजित सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे होते. पुण्याच्या जलजीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यावेळी उपस्थित होते. पावसे यांनी केलेल्या शैक्षणिक सेवेची दखल घेत संस्थेतर्फे त्यांना स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह देण्यात आले.

राजेंद्र रहाणे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता त्यांच्यात मूल्यांची, चांगल्या विचारांची रुजवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी विविध अंगी चौफेर वाचन करणे आवश्यक आहे. बदलते तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले पाहिजे तरच ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवू शकतील.
यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी पुण्याचे उपमृदा सर्वेक्षण अधिकारी रणजीत सिंग माचरेकर, इंडसिस सॉफ्ट इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित वाळे, संस्थेचे अध्यक्ष आनंदराव कढणे, एम. एम. फटांगरे, डॉ. रमेश पावसे, डॉ. प्रमोद पावसे, ॲड भगवान उऱ्हे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी आजी-माजी विद्यार्थ्यांनी शिक्षक रमेश पावसे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू, सेवाकाळातील विविध प्रसंग यांचे विवेचन, त्यांच्या सहवासातील विविध क्षण, जीवनपटातील विविध आठवणींना भावुक होऊन उजाळा दिला. यावेळी हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, एस. एम. राहणे, दिनेश थोरात यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीमती हांडे, सन्मानपत्राचे वाचन मदन माने यांनी केले. सूत्रसंचालन सर्जेराव वाघ, श्रीमती भालेराव यांनी केले.

