महाराष्ट्र संवाद न्यूज
समाजामध्ये महिला बालकांवर होणारे अन्याय अत्याचार तसेच बालविवाहासारख्या चुकीच्या प्रथांवर प्रतिबंध आणणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासन व सर्व समाज घटकांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी केले.

संगमनेर तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मुख्य प्रशासकीय विभागांच्या प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या. नायब तहसीलदार गणेश तळेकर व राजेश पऊल, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गोर्डे, ॲड. रंजना गवांदे आदी उपस्थित होते. 
रुपवते म्हणाल्या, अक्षय तृतीयेचा मुहूर्त आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये ग्रामीण भागांमधल्या बालविवाहांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशासकीय विभागांनी सतर्क राहून गाव पातळीवरील “बाल संरक्षण समित्या” स्थापन करून प्रतिबंधात्मक काम करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्वच यंत्रणा सकारात्मक भूमिका घेऊन पुढील काळात काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात असलेल्या हेल्पलाइनवर मदत मिळू शकते असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या हेल्पलाइन संबंधितही सर्व माहिती सदृश्य भागामध्ये प्रत्येक गावात, ग्रामपंचायतमध्ये लावण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी लोकपंचायत, जयहिंद लोक चळवळ, एकविरा फाउंडेशन आदी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
या संदर्भात काम करत असताना काही अडचणी आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क करून मदत मिळू शकते…
पोलीस यंत्रणा – ११२
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हेल्पलाइन नंबर – १५५२०९
चाइल्ड लाइन – १०९८

