अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
तब्बल सात महिने उलटून गेल्यानंतर देखील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणाऱ्या म्हाळुंगी नदीतील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासन अद्यापही करू शकले नाही. पालिकेत सुरू असलेला प्रशासकीय कारभार आणि राजकीय श्रेय वादाच्या टोलवाटोलवीमध्ये या फुलाचा प्रश्न अडकला असल्याने आता या प्रश्नी स्थानिक नागरिक आणि संगमनेरकरांनी आपली वज्रमुठ आवळली असून आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी (२४ एप्रिल) म्हाळुंगी नदीवरील पडलेल्या पुलाच्या दुरुस्ती करता आंदोलन करण्यात येणार असून तशा आशयाचे निवेदन तब्बल दीडशे लोकांनी प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
या प्रश्नी संगमनेरकरांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या असल्याचे दिसते. या पुलावरून दररोज हजारो व्यक्तींची ये-जा सुरू असते. परिसरात असलेली विविध मंदिरे त्यामुळे देवदर्शनासाठी येणारे नागरिक, प्रवरा नदीकाठ-गंगामाई घाट या परिसरात पहाटे, सकाळी, संध्याकाळी फिरण्यासाठी येणारे शेकडो आबाल वृद्ध, केशवतीर्थ घाटावर दशक्रिया विधीसाठी येणारे शेकडो लोक, शाळा आणि महाविद्यालयात येणारे तीन हजारावर विद्यार्थी, साईनगर पंपिंग स्टेशन कासारवाडी परिसरातील शेकडो रहिवाशी आदींचा या पुलावरून नियमित वावर असतो.
सध्या संगमनेर नगर परिषदेत प्रशासकीय राज सुरू असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात कोणतेही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. नगरपरिषदेत कौन्सिल नसल्याने कोणत्याही कामासाठी मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांना सर्वाधिकार आहेत. मात्र तरीदेखील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यकता वाटत नसून पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये केवळ पत्र व्यवहाराची टोलवाटोलवी सुरू आहे. अशा परिस्थितीत पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच प्रमुख राजकीय नेत्यांना अपयश आल्याचे दिसते.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दोघा माजी नगरसेवकांसह सह्या करणाऱ्या नागरिकांनी म्हटले आहे की, म्हाळुंगी पूल कोसळून भरपूर दिवस झाले आहे. नागरिकांनी मुख्याधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रार करूनही अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही. या पुलासंदर्भात विद्यार्थी, पालक, भाविक व नागरिकांशी कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी महिला भाविकांचा आपल्याबद्दल रोष वाढत चालला आहे. भविष्यात नागरिकांकडून कुठल्याही उद्रेक होऊ शकतो. तरी आपण या संदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलून यातून मार्ग काढावा, असे वारंवार सुचवले आहे.
आमचे येणे- जाणे बंद झाल्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास मनस्ताप होत आहे. यात खास करून विद्यार्थी व वृद्ध व्यक्ती यांचा समावेश असल्याने आपणांस कळकळीची विनंती आहे की, आपण पडलेल्या पुलाची नवीन बांधकाम इस्टिमेट निविदा मंजूर होईपर्यंत त्या ठिकाणी मुरूम किंवा रिबेट टाकून तात्पुरता येण्या-जाण्याचा रस्ता, नागरिकांसाठी पायी जाण्याचा मार्ग करून द्यावा. त्यावरून जड वाहतूक होणार नाही अशी व्यवस्था करावी. आपणाकडून असे होणार नसल्यास आम्ही आंदोलनात्मक पवित्र घेतल्यास प्रशासन याला जबाबदार राहील. या पत्राचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

