महाराष्ट्र संवाद न्यूज
‘पंचवीस वर्षांपासून मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने आयोजित केला जाणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सर्व धर्मीयांसाठी एक आदर्श उपक्रम आहे. जनहिताच्या या उपक्रमाचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. साधेपणाने लग्न समारंभ करण्याचा संदेश सर्वांनी मनावर घेतला तर कर्जबाजारीपणातून होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत’, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी येथे केले.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आमदार तांबे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, कामगार नेते कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड माधवराव नेहे, कॉम्रेड ॲड. ज्ञानदेव सहाणे, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, जय मनीष मालपाणी उपस्थित होते.
तांबे यांनी मालपाणी उद्योग समूह आणि मालपाणी परिवाराचे विशेष कौतुक केले. “1997 साली सुरू केलेली सामुदायिक विवाहाची परंपरा अखंड चालविण्याचे काम मालपाणी परिवाराने कायम ठेवले आहे. सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्याची वृत्ती यातून दिसून येते. सामुदायिक विवाहामुळे समाजात जागृती होत आहे. खूप खर्चिक लग्न करण्याच्या चढाओढीच्या पद्धतीमुळे ऐपत नसल्याने मागील काही वर्षात कर्जापोटी आत्महत्या केल्याची उदाहरणे निष्पन्न झालेली आहेत. आर्थिक सुस्थितीत असलेल्या माहेश्वरी समाजामध्ये खर्चिक विवाह टाळण्यासाठी काही विशिष्ट नियम करण्यात आलेले आहेत त्यांचे स्वागत केले पाहिजे” असे ते म्हणाले.
दुर्गाताई तांबे यांनी आपल्या भाषणामध्ये मालपाणी उद्योग समूहाच्या विवाह सोहळ्यातील 25 वर्षांच्या सातत्याचे आणि काटेकोर नियोजनाचे भरभरून कौतुक केले. डॉ. जयश्री थोरात यांनी सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून मालपाणी परिवार पंचवीस वर्षांपासून विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहे. त्याला सर्व धर्मांमधून चांगला प्रतिसाद मिळतो. ही अत्यंत समाधानाची गोष्ट असल्याचे म्हटले.
प्रास्ताविक करताना डॉ. संजय मालपाणी यांनी मालपाणी उद्योग समूह हा या संपूर्ण सोहळ्यामध्ये वधू पित्याच्या भूमिकेत असतो त्याचे खूप मोठे समाधान मिळते. आजवरच्या वाटचालीत १२५६ परिवार जोडण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने करणे शक्य झाले. आज विवाहबद्ध झालेल्या 27 दांपत्यांपैकी 13 विवाह हे आंतरजातीय असून अनेक वधू -वर एमबीए, इंजिनियर, पदवीधर, द्विपदवीधर असे उच्चशिक्षित असून रत्नागिरी, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नगर या पाच जिल्ह्यातील वधूवरांनी आपल्या जीवनाचा वैवाहिक जीवनाचा शुभारंभ करण्यासाठी येथील सोहळ्याची निवड केली ही बाब अभिमानास्पद आहे’ असे डॉ. मालपाणी म्हणाले.
बौद्ध विवाहाचे विधी बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी तर हिंदू पद्धतीच्या विवाहाचे विधी भाऊ जाखडी यांनी केले. आभार गिरीश मालपाणी यांनी मानले तर सूत्रसंचालन मुरारी देशपांडे व राम पाटसकर यांनी केले.
क्षणचित्रे
♦️संपूर्ण मालपाणी लॉन्स परिसर आकर्षक रित्या सजविण्यात आला होता. वसुंधरा दिनाचे औचित्य साधून व्यासपीठाची पार्श्वभूमी हिरव्या रोपांनी सजविण्यात आली होती. व्यासपीठावर साकारलेली राजस्थानी महालाची सुबक देखणी भव्य प्रतिकृती शोभा वाढविणारी ठरली.
♦️सकाळपासूनच मालपाणी लॉन्स परिसर वऱ्हाडी मंडळींनी फुलून गेला होता. त्यांना मार्गदर्शन करण्यास समितीचे सदस्य असल्याने सर्वांना सहजपणे आपापल्या वधू-वरांपर्यंत पोचता येत होते.
♦️ संपूर्ण सोहळ्याचे व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सांभाळण्यासाठी २७ समित्या तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक सदस्याला ओळखपत्र आणि गणवेश देण्यात आला होता. दिवसभर हे सदस्य सर्वांना मदत आणि मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे भरगच्च उपस्थिती असूनही संपूर्ण सोहळा सर्वांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.
♦️मालपाणी समूहाचे सुरक्षा रक्षक नेमून दिलेल्या ठिकाणी आपापली जबाबदारी चोख बजावीत होते.
♦️सकाळी ११ वाजल्या पासून उत्सव सभागृहात दहा हजारहून अधिक लोकांनी पंगतीत भोजनाचा आस्वाद घेतला. प्रत्येक जण भोजन झाल्यावर आपले पात्र उचलून कंटेनरमध्ये टाकीत होते. त्यामुळे इतकी मोठी पंगत होऊनदेखील कुठेही अन्न पायदळी गेले नाही.
♦️भोजन झालेल्यांसाठी विरंगुळा म्हणून ‘स्वरमाधुर्य’ वाद्यवृंदाचा कार्यक्रम हिरवळीवर दिवसभर सुरु होता. त्याचा मनसोक्त आनंद पाहुणे मंडळींनी घेतला.
♦️नवरदेवांची भव्य सवाद्य मिरवणूक सजवलेल्या तीन ट्रॉलीमधून काढण्यात आली. ती लक्षवेधी ठरली. इतकी भव्य मिरवणूक असूनही शिस्तबद्धतेमुळे वाहतुकीला जराही अडथळा झाला नाही.
♦️वधूवरांच्या पंगतीत स्वतः राजेश मालपाणी, संगीता, अनुराधा, सुनीता मालपाणी यांनी वाढप्याची भूमिका आनंदाने पार पाडली.
♦️श्रीमती सुवर्णा मालपाणी व ओंकार तिवारी यांनी मधुर स्वरात सादर केलेली मंगलाष्टके उपस्थीतांच्या कौतुकाचा विषय ठरले.
♦️नवपरिणीत दांपत्यांचा सप्तपदीच्या विधीसाठी हिरवळीवर अनेक होमकुंडे तयार करण्यात आली होती.
♦️वधूवरांचे मामा-मामी यांच्यासाठी व्यासपीठाच्या जवळ विशेष कक्ष तयार करण्यात आला होता.
♦️प्रत्येक दाम्पत्यास लोखंडी कपाट, पलंग, भांडी असे एकंदर २५ हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य मालपाणी समूहाच्या वतीने भेट देण्यात आले.
♦️प्रत्येक दाम्पत्याला एक रोप आणि शिर्डी येथील वेट एन जॉय वाटर पार्क व साईतीर्थ थीम पार्क तिकीट दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, सुवर्णा मालपाणी, शैला पलोड, संगीता, अनुराधा, रचना, सुनीता, श्रेया मालपाणी यांच्या हस्ते भेट देण्यात आले.
♦️अत्यंत दर्जेदार आणि सुस्पष्ट ध्वनी व्यवस्था असल्याने प्रत्येक सूचना सर्वांपर्यंत सहजगत्या पोचत होती.
♦️उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन सभागृहात २० मोठे कुलर्स व तितक्याच पंख्यांची व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
♦️अनेक वधूवरांचे आई-वडील, नातेवाईक यांनी समाधान व्यक्त करत अनेकांनी आपले लेखी अभिप्राय नोंदविले.

