अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील 35 लाख रुपये किमतीचा अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या गदेचा मानकरी महेंद्र गायकवाड ठरला आहे.
अहमदनगरचा वाडिया पार्कमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात गायकवाड विजेता तर राक्षे उपविजेता ठरला. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून हजारावर स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदीसह कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुस्ती हा आपला प्राचीन खेळ असून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम या खेळाला राजाश्रय दिला. त्या पाठोपाठ छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला पाठबळ दिले. बंद पडलेल्या तालीम शाहू महाराजांनी पुनर्जीवीत केल्या. त्यांनीच कुस्तीतील विजेत्यांना चांदीचे गदा देण्याची परंपरा सुरू केली होती. आज पुन्हा या स्पर्धेच्या रूपाने विजेता स्पर्धकांना सोन्याची गदा देण्याची परंपरा सुरू झाली ही आनंदाची बाब आहे.
भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधव यांनी पटकाविले. त्यानंतर अद्याप हे पदक मिळू शकले नसल्याची खंत व्यक्त करत पुढील ऑलिंपिक विजेता हा महाराष्ट्राच्या मातीतूनच झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पैलवानाचे मानधन ३ हजारांहून १८ हजार रुपयांपर्यंत वाढविले. तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजय चौधरी यांना थेट पोलीस उपअधीक्षक पदाची नोकरी देण्यात आली. असे देखील फडणवीस म्हणाले.
मंत्री विखे पाटील यांच्यासह स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार प्रा. राम शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

