महाराष्ट्र संवाद न्यूज
स्वत:च्या नावाने व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यापेक्षा म्हाळुंगी नदीच्या पुलाकरीता निधी आणण्याचे प्रयत्न केले असते तर, आपले अपयश उघडे झाले नसते. परंतू आता आपल्याला निधीही आणता येत नाही हे सर्व जनतेला कळाल्यानेच आपल्या अपयशाचे खापर दुस-यांवर फोडण्याचा आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असाच असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांनी केला आहे.
म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आ. थोरात यांनी केलेल्या आरोपांना भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, अमोल खताळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
म्हाळुंगी नदीवरील पुल कुणामुळे खचला याची संपूर्ण कल्पना संगमनेरच्या जनतेला आहे. परंतू सत्ता नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या थोरातांना पुलाच्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निधी मंजुर करुन आणण्यात अपयश येत आहे. त्यामुळेच आपल्या अपयशाचे खापर दुस-यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
वास्तविक राज्य सरकारने पुलाच्या कामासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनही या पुलाच्या कामाचे सर्व प्रस्ताव नगरविकास विभागाकडे देण्यात आलेले आहेत. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पुलाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बाब म्हणून ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी यापुर्वीच पत्र दिले असल्याची वस्तुस्थिती असतानासुध्दा कोणत्याही विषयाची माहीती करुन न घेता केवळ भारतीय जनता पक्षावर बेछुट आरोप करुन, थोरात वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. पुलाच्या कामासाठी जनता रस्त्यावर उतल्यानंतर थोरातांनी पुलाच्या कामावरून बोलायला सुरूवात करावी हे सुध्दा आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
पुलाच्या कामाला महत्व न देता स्वत:च्या नातेवाईकांच्या नावाने व्यापारी संकुल उभारण्याच्या कामाला प्राधान्य देणा-या थोरातांनी या व्यापारी संकुलाच्या कामाचा सर्व निधी पुलाच्या कामासाठी वर्ग करावा. असे थेट आव्हान भारतीय जनता पक्षाच्यावतीने देतानाच आपल्या बगलबच्चे असलेल्या ठेकेदारांच्या चूकीमुळे खचला असून यावर सुध्दा थोरातांनी बोलावे अशी मागणी करण्यात आली आहे.

