महाराष्ट्र संवाद न्यूज
दररोज सात लाख लिटरपेक्षा अधिक दूध निर्माण होणारा संगमनेर तालुका दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जाणीव जागृती होण्यासाठी स्थानिक दूध संघाचे सचिव, पर्यवेक्षक यांनी अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि आनंद यांच्या विद्यमाने पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत देशमुख बोलत होते. यावेळी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे राहुल नायर, डॉ. शुभांकर नंदा, डॉ. सागर श्राफ, सीमा माथुर, डॉ. सरोज वहाने, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात समृद्ध सहकार निर्माण झाला. शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय हा येथील शेतकऱ्यांच्या प्रमुख व्यवसाय बनल्याने या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये पर्यायाने तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली.
संगमनेर तालुक्यात पशुधन मोठे आहे. मात्र या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत अधिक प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे. यामध्ये गाय, म्हैस यामधील वांझपणाबाबत उपचार, खनिज मिक्सरचे दुधाळ गाईंमध्ये महत्त्व, हिरवा व कोरड्या चाऱ्याचे महत्त्व, कालवडीचे संगोपन, गोठ्याचे व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, घरच्याघरी खाद्य बनवायच्या पद्धती याबाबतही अधिक माहिती दूध उत्पादकाऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे.
पशुंच्या आरोग्याची जेवढे जास्त काळजी घेतली जाईल तेवढे जास्त प्रमाणात दूध उत्पादन देखील होईल. याकामी गावांमधील दूध संस्थांचे सचिव, पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधितांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. नायर म्हणाले, राजहंस दूध संघाने मुक्तसंचार गाय गोठा ही संकल्पना प्रभावीपणे राबवली. यामुळे गायींच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यावी असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ. शुभांकर नंदा, डॉ. सागर श्रॉफ, डॉ. सीमा माथुर, डॉ. सरोज वाहने यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले.

