महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरमधील पतसंस्था चळवळीतील अग्रेसर शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश लाहोटी यांची तर उपाध्यक्षपदी रोहित मणियार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाचे बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत अनुक्रमे लाहोटी आणि मणियार यांच्यावर आर्थिक वर्षासाठीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संस्थापकांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने आर्थिक शिस्त लावत प्रगतीची गरुडभरारी घेतली आहे. त्यांच्याच पदचिन्हावर आपण यापुढेही कार्यरत राहणार असल्याचा विश्वास नव्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसाठी अर्थवाहिनी ठरलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने गत आर्थिक वर्षात 168 कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. या आर्थिक वर्षात ठेवींचा हा टप्पा दोनशे कोटी रुपयांवर नेण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाने केला आहे. 128 कोटी 55 लाख रुपयांचे संस्थेने कर्ज वितरण केले आहे.
नूतन पदाधिकारी निवडी वेळी संस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांना अधिकाधिक गतीमान आणि चांगल्या सेवा देण्यासाठी संस्थेने मागील कालावधीत राबविलेल्या विविध योजना व प्रकल्पांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. व्यापार्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, या हेतूने संस्थेची स्थापना झाली आहे. याच मार्गावर विद्यमान संचालक मंडळ कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
नूतन अध्यक्ष राजेश लाहोटी व उपाध्यक्ष रोहित मणियार यांनी संचालक मंडळाने विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रामाणिक कर्जदार आणि समर्पित संचालक मंडळ या संस्थेच्या धोरणानुसार काम करताना संस्थेच्या प्रगतीसोबतच ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. निवडीप्रसंगी श्रीमती सुवर्णा मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, प्रकाश राठी, दीपक मणियार यांच्यासह संस्थेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

