महाराष्ट्र संवाद न्यूज
देशातील औद्योगिक क्षेत्राकडून समाजाच्या हितासाठी राबविल्या जाणार्या सामाजिक उपक्रमांमध्ये संगमनेरच्या मालपाणी उद्योग समुहाचा ठसा उमटला आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत मालपाणी उद्योग समुहाला यावर्षीच्या ‘सीएसआर हिरो’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात शानदार सोहळ्यात उद्योग समुहाचे संचालक आशीष मालपाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या आणि सातत्याने राबवून कर्तव्यपूर्ती केल्याबद्दल मालपाणी उद्योग समुहाला गौरवान्वित करण्यात आले. एका माध्यम समुहाने आयोजित केलेल्या या सोहळ्यावेळी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवभारत समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदींसह औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शासनाकडून झालेला गौरव उत्साह वाढवणारा असून यापुढे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत मालपाणी यांनी उद्योग समुहाकडून राबविल्या गेलेल्या विविध समाजसेवी उपक्रमांची माहिती दिली. मागील 25 वर्षांपासून केवळ एक रुपयात होणारा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, नाममात्र दहा रुपयात तज्ज्ञ डॉक्टरांच्यावतीने तपासणी आणि सवलतीच्या दरात औषधांची व्यवस्था असलेले मालपाणी हॉस्पिटल, कोविड संक्रमणाच्या कालावधीत मालपाणी हॉस्पिटलकडून झालेली रुग्णसेवा, या कालावधीत उद्योग समुहाच्यावतीने पुण्यात उभारण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत जयपूर फूट आणि प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन याशिवाय कोविड संक्रमणाशी लढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या सहाय्यता निधीत भरीव आर्थिक योगदान दिले.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योग समुहाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलेले योगदान, माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून सुरु असलेली रुग्णसेवा, शैक्षणिक क्षेत्रात संगमनेर महाविद्यालयाला भरीव योगदान देतांना सुसज्ज संस्कृत संशोधन केंद्र सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद संगमनेर शहर स्वच्छतेसाठी राबविलेला उपक्रम पथदर्शी ठरला. पर्यावरण संवर्धनातही उद्योग समुहाने मोठे काम केल्याचे सांगत कपारेश्वराच्या माळरानावर लावण्यात आलेल्या 51 हजार वृक्षांमूळे त्या परिसराचा कायापालट झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
संगमनेरच्या समाजाशी एकरुप झालेल्या मालपाणी उद्योग समुहाने जलजागृतीसाठी केलेले काम, दरवर्षी लाखों रोपांचे विनामूल्य वितरण, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणार्या गरजू विद्यार्थ्याना अर्थसहाय्य, गोरगरीब रुग्णांना दुर्धर आजार आणि खर्चिक शस्त्रक्रियांसाठी मदत, धार्मिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा विषयक आणि राष्ट्रीय हिताच्या उपक्रमांना सातत्यपूर्ण आर्थिक सहयोग, संगमनेर, पाथर्डी व पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्य, संगणक, स्वच्छ पाण्याची यंत्रे व अन्य उपयोगी साहित्याचे वाटप, जिल्हा रुग्णालयास संगणक संच अशा वेगवेगळ्या उपक्रमातून उद्योग समूह आपले सामाजिक उत्तरदायित्व जोपासले.
उद्योग समुहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांचा समाजसेवेचा वारसा मालपाणी उद्योग समुहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संजय, मनीष, गिरीश, यशोवर्धन, जय व हर्षवर्धन मालपाणी जोमाने पुढे चालवत असल्याचेही मालपाणी यांनी सांगितले.

