महाराष्ट्र संवाद न्यूज
तब्बल तीन मंत्री, प्रमुख अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महसूलमंत्र्यांच्या लोणीच्या दिशेने निघालेले लाल वादळ अखेर संगमनेरच्या सीमेवर थांबले आहे. सरकार आंदोलकासोबत असल्याचा विश्वास आंदोलकांना दाखविण्यात आला. मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर यासंबंधीची घोषणा तीनही मंत्र्यांनी आंदोलन स्थळी केली.
शेतकरी, आदिवासी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेत राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर महा मुक्कामासाठी अकोल्याहून किसान सदस्य विविध संलग्न संस्थांनी बुधवारी पायी मोर्चा सुरू केला होता. शनिवारी मोर्चा धांदरफळमध्ये (संगमनेर) मुक्कामाला होता. मोर्चा अकोल्यातून सुरू होण्यापूर्वी महसूल तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी मोर्चेकर्यांना सकारात्मक चर्चेचे निमंत्रण दिले होते. मात्र तरीदेखील आंदोलन आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी सायंकाळी पायी मोर्चाला सुरुवात केली.
गुरुवारी हा मोर्चा संगमनेरच्या वडगाव पानमध्ये मुक्कामी थांबणार होता. मात्र तत्पूर्वीच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आंदोलकांशी संवाद साधून होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपले नियोजित कार्यक्रम बदलत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांच्यासह संगमनेर गाठले. कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह आंदोलक शिष्टमंडळासोबत संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. येथील चर्चा यशस्वी झाल्यानंतर धांदरफळ येथे थांबलेल्या मोर्चेकर्यांसमोर याबाबतची माहिती दिल्यानंतर मोर्चा थांबविण्यात आला.
मागण्या संदर्भात सरकार संवेदनशील असून 30 मे रोजी यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. संगमनेरच्या प्रांत कार्यालयात मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत डॉ.अजित नवले यांच्यासह डॉ. अशोक ढवळे, उमेश देशमुख, चंद्रकांत गोरखाना, किसन गुजर, रडका कलांगडा, यशवंत झाडे, उद्धव पोळ, माणिक अवघडे, रमेश चौधरी, चंद्रकांत वरण, विजय काटेला, शंकर सिडाम, अजय बुरांडे, गोविंद आर्दड, अनिल गायकवाड, महादेव गारपवार, अमोल वाघमारे, सदाशीव साबळे, किरण गहला, डॉ.अशोक थोरात, संगिता साळवे, सुनिता पथणे, सचिन ताजणे, नामदेव भांगरे, निर्मला नागे, रंजना पर्हाड, डॉ.करण घुले, नंदू डहाळे, संतोष वाडेकर, अण्णासाहेब शिंदे, अनिता साबळे यांचा समावेश होता.

