महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेरच्या पेटलेल्या वाळू तस्करीमुळे जर महसूल खाते बदनाम होणार असेल तर मला तुमच्यावर कारवाई करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील तलाठी, ग्रामसेवकांना इशारा दिला आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्रीपदाचा पदभार हाती घेतल्यानंतर संगमनेरच्या अवैध वाळू तस्करीकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे येथील वाळू तस्करीला काही अंशी लगाम बसला. तसेच राज्यभरातील वाळू तस्करी लक्षात घेत त्यांनी वाळू संदर्भात नवीन धोरण आणले आहे नव्या धोरणाची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून (१ मे) करण्यात येणार आहे.
असे असले तरी संगमनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांकडून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेली ही वाळू तस्करी रोखण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. किंबहुना या वाळू तस्करीमध्ये महसूलचे काही अधिकारी सामील असल्याचा आरोप होत असल्याने त्यामुळे ही तस्करी थांबू शकलेली नाही, असे देखील म्हटले जाते.
काही दिवसांपूर्वी संगमनेरच्या गंगामाई घाटावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी घाट परिसरातील वाळू तस्करी थांबावी यासाठी अचानकपणे आंदोलनदेखील केले होते. तेव्हा केवळ तलाठ्याचा अपवाद वगळता महसूल खात्याचा कोणताही अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नव्हता. या परिसरात दोन दिवस बंद असलेले वाळू तस्करी पुन्हा नव्या जोमात सुरू आहे. त्यामुळे वाळू तस्करी मध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा नागरिकांच्या आरोपाला पुष्टी मिळते.
संगमनेर मधून अद्यापही मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याच्या तक्रारी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे करण्यात येत असल्याने त्यांनी गुरुवारी संगमनेरमध्ये झालेल्या शासकीय आढावा बैठकीत यावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात एकीकडे आपण वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरु करीत आहोत. परंतू दुसरीकडे तुम्हीच जर महसूल खात्याला बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठरत असाल तर मला कारवाई करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात त्यांनी तलाठी, ग्रामसेवकांना याबाबत अतिशय कडक शब्दात समज दिली आहे.
त्यामुळे तलाठी, ग्रामसेवकांसह संगमनेरचे महसूल अधिकारी नव्या वाळूधोरणाची कठोरपणे अंमलबजावणी करतात की वाळू तस्करी ला प्रोत्साहन देऊन कारवाईला पात्र ठरतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

