संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
डिजेमुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्नविधी वेळेवर व्हावेत व विधवेची हेटाळणी टाळण्यासाठी गाव पातळीवर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभामध्ये ठराव घेण्यासाठी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिनींनी पुढे सरसावल्या आहे. चुकीच्या प्रथांविरोधात त्यांनी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना निवेदन दिले. त्या संदर्भात तातडीने कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले.
लग्न समारंभातील होणाऱ्या खर्चावर तसेच मृत्युनंतर करण्यात येणाऱ्या अनिष्ठ रूढी परंपरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या रणरागिणीमध्ये
वृषाली कडलग, ॲड. सीमा सातपुते, स्नेहलता कडलग, माधुरी शेवाळे, डॉ. नीलम शिंदे, डॉ. श्रद्धा वाणी, सुधा नवले, कस्तुरी शेवाळे आदींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात लग्न समारंभावर होणारी पैशांची उधळपट्टी वाढली आहे. लग्न वेळेवर लागत नाही. उशिरापर्यंत आलेल्या वऱ्हाडींना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो. मृत्युनंतर सुद्धा अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, कालबाह्य परंपरा वाढत चालल्या आहेत. मृत झालेल्या पुरुषांच्या बायकोची (विधवा महिलेची) अंधश्रद्धेतून हेटाळणी केले जाते. बहुजन समाजाने यातून बाहेर पडावे असे आवाहन करत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी. पुरुषोत्तम खेडेकर यांनी समाजाला काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी मद्यपान करून डिजेच्या तालावर नाचते. त्यामूळे व्यसनाधींनतेचे प्रमाण वाढत चालले आहे. मोठ्या आवाजातील डीजेमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्णकर्कश डिजेच्या आवाजामुळे समाज, रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर या सर्व बाबी बंद व्हाव्यात यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिनी (ता. १ मे) संपूर्ण महसूल विभागात डिजे मुक्त लग्न, दारूमुक्त वरात, वेळेवर लग्न हे ठराव ग्रामपंचायतमार्फत ग्रामसभेत पास करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सूचना कराव्यात, अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांकडून करण्यात आली.
☆
समाजधुरीनांनी चुकीच्या प्रथाविरोधात आवाज उठवत बहुतांशी प्रथा बंद केल्या असल्या तरी आजही काही चुकीच्या प्रथा समाजात सुरूच आहे. पतीच्या निधनानंतर समाजात महिलांना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत असते. अशा प्रथा असाव्यात, असे आपल्या राज्यघटनेत कुठेही म्हटलेले नाही. विधवा पुनर्विवाह यासाठी प्रयत्न आवश्यक असून या चुकीच्या प्रथांविरोधात काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ॲड. सीमा सातपुते-काळे

