संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनेकांनी हुतात्मे पत्करले. मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा निर्मितीला मोठा इतिहास आहे. देशाच्या विकासामध्ये आपल्या राज्याचा वाटा सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त थोरात यांच्या हस्ते संगमनेरमध्ये शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, विविध परंपरेने नटलेल्या महाराष्ट्राचा विकासातील अग्रगण्य राज्य म्हणून देशात लौकिक आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे आपण 75 वे तर राज्याच्या निर्मितीचे 63 वे वर्ष साजरे करीत आहोत. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि नवनिर्मित महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातील एक मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
63 वर्षाच्या वैभवशाली वाटचालीतून महाराष्ट्र हे देशातील सर्वात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जात आहे. महाराष्ट्र दिनाबरोबर आज कामगार दिन साजरा होत असुन महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगारांचाही मोठा वाटा राहिला. कृषी, सहकार, औद्योगीकरण, शिक्षण, सांस्कृतिक व वैभवशाली वातावरण हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून यापुढेही राज्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

