संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्य युद्ध सुरु आहे. यामध्ये पवार यांचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याने त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असं महत्त्वाचं विधान काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर थोरात यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे. अशा अडचणीच्या काळात लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी नवे स्वातंत्र्ययुद्ध सुरू आहे. यामध्ये पवार साहेबांचे मोठे महत्त्व आहे.
लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लढाई करत आहे. आणि त्यांच्या या लढाईत साथ देणारी देशपातळीवरील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार आहेत.
त्यामुळे देशाची लोकशाही राज्यघटना वाचविण्यासाठी पवार साहेबांनी सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे असून ते या लढाईत महत्त्वाची व्यक्ती असल्याचे त्यांना बाजूला जाऊन चालणार नाही, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

