संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
जलजीवन आणि जीवन प्राधिकरणांच्या योजनांची काम ज्या ठिकाणी सुरू आहे ती बंद होता कामा नये. राजकारणासाठी काही लोक ही कामे बंद पाडण्याचे काम करत आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये असा सल्ला राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.
येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीमध्ये टंचाई व खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. यावेळी थोरात बोलत होते.
तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देताना थोरात म्हणाले, राजकारणासाठी कोणीही जनतेच्या भावनांशी खेळू नये. संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी आणि उंबरी बाळापुर येथील चल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. मात्र केवळ राजकारणासाठी या योजना बंद पाडण्याचे काम काही लोक करत असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडू नये.
संगमनेरमधील विकास काम बंद पाडण्याचे काही लोक उद्योग करत आहे. अधिकाऱ्यांनी मंजूर झालेली सर्व कामे अधिक चांगली होण्यासाठी काम करावे. सत्ता येते आणि जाते देखील त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करावे. असा सल्ला आमदार थोरात यांनी संगमनेरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.

