अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
येत्या पंधरा दिवसात अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा, शासन आपल्या दारी उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
विखे म्हणाले, शासनाच्या सर्व विभागांनी आपसात समन्वय ठेवत शासन आपल्या दारी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावी. योजनांचा लाभ सामान्यांना तत्परतेने दिला जावा. संवाद मोहीम राबविली जावी. जिल्ह्यातील औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना मिळावी याकरिता एमआयडीसी पर्यटन महामंडळाने विकासाचा आराखडा तयार करायला हवा. औद्योगीकरणाला चालना देण्यासाठी छोटे छोटे क्लस्टर तयार करा धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करा.
जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांची युद्ध पातळीवर स्वच्छता करा. नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबवा. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे सूक्ष्म नियोजन करा. जनावरांना चारा कमी पडणार नाही, याची दक्षता घ्या. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यांची कामे करा. जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या ठिकाणी त्वरित फलक लावण्याचा सूचना विखे यांनी यावेळी दिल्या.

