अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडे, आत्माचे प्रकल्प संचालक विकास नलगे, कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, जादा दराने खत विक्री करणे, खतांचा साठा करून ठेवणे, लिंकिंग करणे अशा स्वरूपाची अवैध कामे करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कार्यवाही केली जावी. तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. तसेच अवैध विक्रीला पायबंध घालावा. निविष्ठा उपलब्धतेसंदर्भातील फलक दुकानाबाहेर लावण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी तक्रारीच्या निराकरणासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करा.
राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जावा. आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त अधिकाधिक शेतकऱ्यांना भरडधान्य लागवड करण्यासाठी प्रोत्साहन द्या. कृषी विभागाच्या योजनांचा मासिक आढावा घ्या. राहुरी विद्यापीठाच्या तज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा. मागील तीन वर्षापेक्षा जास्त कृषी पीक उत्पादन वाढीसाठी कृषी अधिकारी व विद्यापीठाच्या तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
जलयुक्त शिवार टप्पा 2 साठी जिल्ह्यात 257 गावांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती देत यापुढे अधिक उत्साहाने ही योजना राबविली जावी. एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री विखे यांनी यावेळी व्यक्त केली.

