संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
सध्या देशात धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. देशात व राज्यात आगामी काळात सत्ता बदल निश्चित असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षात युवकांसाठी मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी डॉ. जयश्री थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व रामहरी कातोरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पापडेजा आदींसह युवक पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाला मोठी वैभवशाली परंपरा लाभली आहे. काँग्रेसचा विचार हा गोरगरिबांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या काळात सर्वसामान्यांसाठी राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना, अन्नसुरक्षा कायदा, शिक्षणाचा मूलभूत अधिकार आदीसारखे ऐतिहासिक महत्त्वाचे निर्णय झाले. याच काळात देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली होती.
मात्र नंतरच्या काळात भूलथापा देत सत्तेवर आलेले भाजप सरकार हे धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. विकासाऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जात असून देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आदी मूलभूत प्रश्न असून या प्रश्नावरून लक्ष इतरत्र वळविले जात आहे. वज्रमुठ सभांसह निवडणुकांमध्ये जनतेचा पाठिंबा मिळत असून राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात देशात व राज्यात सत्ता बदल नक्की आहे.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका विकासातून समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. सत्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपसातील मतभेद दूर ठेवत संघटितरित्या आमदार थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा.

