दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज)
उद्या गुरुवारी (ता. 11 मे) घटनापीठाकडून दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा तसेच राजकीय पक्षांची धाकधूक वाढविणारा ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाकडून राखून ठेवण्यात आलेला महाराष्ट्रातील सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय जाहीर केला जाणार असल्याने यामुळे राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सोळा आमदारांच्या पात्रते, अपात्रतेसंदर्भात उद्या फैसला होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा बरोबरच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं ‘लाईव्ह लॉ’ नं म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. यादरम्यान वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकालापूर्वी राजीनामा देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र यादरम्यान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे पदाचा राजीनामा देणार नाहीत आणि सरकार स्थिर असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचं उद्या कोर्टातून लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. जनतेला हा निकाल लाईव्ह पाहता येणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा निकाल असेल. त्यामुळे जनतेला कोर्टाचा निकाल थेट कोर्टातून पाहता येणार आहे.

