संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या जल्लोषांमध्ये सहभागी झाले होते.
थोरात म्हणाले, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष आहे. २०१४ मध्ये भुलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने स्वतःच्या फायद्याच्या राजकारणासाठी देशातील स्वायत्त संस्थांचा वापर केला. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहे. भाजपाची कार्यपद्धती ही दहशत आणि द्वेषाची असून समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी आहे. यामुळे भारतातील नागरिक अस्वस्थ आहेत.
जनतेमधील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ३५६० किलोमीटरची केलेली भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरली. या यात्रेतून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला. श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता उभी राहिली आहे.
जनतेचा काँग्रेसवर मोठा विश्वास असून आगामी काळात देशात व राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी, देशाचा विकास घडवण्यासाठी, स्वायत्त संस्थांना पुन्हा स्वायत्तता देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गरजेचा आहे. देशात व महाराष्ट्रातही परिवर्तन नक्की होणार असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

