नवी दिल्ली (महाराष्ट्र संवाद न्यूज)
मतदारांनी बहुमताने कर्नाटक काँग्रेसच्या हाती सोपविल्यानंतर काँग्रेसने सरकार येताच आपल्या आश्वासनपूर्तीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्या पाच वचनांच्या बळावर काँग्रेसला सत्ता सोपविले गेली त्या पाच वचनांची पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्तता करण्यासाठी मंजुरी दिली जाणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती मोठा विजय मिळवत भाजपला सत्तेत येण्यापासून रोखले आहे. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाच घोषणा कर्नाटकमध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या आहे. यामध्ये सखी योजनेअंतर्गत कर्नाटकमधील सर्व महिलांना मोफत बस प्रवास, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये, युवा निधी अंतर्गत कर्नाटकातील बेरोजगार पदवीधारकांना दरमहा तीन हजार रुपये, बेरोजगार डिप्लोमा धारकांना दरमहा दीड हजार रुपये, अन्नभाग्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा प्रति व्यक्ती दहा किलो तांदूळ आणि गृह ज्योति योजनेअंतर्गत कर्नाटकमधील प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिटपर्यंत मोफत विजेचा समावेश होता.
याशिवाय दोन लाख सरकारी आणि दहा लाख खासगी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. सरकार सत्तारूढ होताच मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सर्व महिलांना मोफत बस प्रवास घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये आधी घोषणा संदर्भात आश्वासक निर्णय घेणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

