नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज)
शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला ॲक्टिव्ह मोडवर आणतानाच शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान तसेच शासनाच्या विविध योजना मिशन मोडवर घेत गावागावत शिबीरे राबवा. जिथे भाजपचे आमदार नाही त्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही या योजना प्रभावीपणे राबवा. कोणी जर यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर माझा आदेश आहे म्हणून सांगा. विरोधकांच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका, काही अडचण आलीच तर थेट मला कळवा अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल यंत्रणांना दिले.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे म्हणाले, शासनामार्फत राबविल्या जाणार्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम जिल्ह्यात १५ जूनपर्यंत राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसिलदार व मंडळ अधिकारी यांनी गावपातळीवर जनजागृतीसह विविध आवश्यक दाखले व योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यासोबतच गावपातळीवरील विविध योजनांची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत तातडीने निकाली काढण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
योजनांचा प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेचा स्विकार करून आपल्याला काम करायचे आहे. याकरीता भाजप पदाधिकार्यांची मदत घेण्यात येणार आहे. आठवडयातून चार दिवस प्रत्येक गावात तालुकानिहाय शिबीरे राबवून शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. भाजपचे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात हे अभियान राबवतीलच परंतू विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातही प्रशासनाकडून या अभियानाचे आयोजन करावे याकरीता भाजप पदाधिकारी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडतील. त्यामुळे सरकारी योजना राबवतांना विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका जर कोणी या कामांमध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर विखेंचे आदेश आहेत असे स्पष्टपणे सांगा तरीही कोणी अडचण निर्माण केलीच तर थेट मला कळवा बाकीचे मी बघतो असे सांगत त्यांनी प्रशासनानेही योजना राबवतांना चालढकल करू नये असे सांगितले.

