संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – पुढील महिन्यात संगमनेरातील अर्थकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेचे निवडणूक होत आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न सुरू केले असून चार विरोधी उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी सामावून घेतल्यास बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करण्यास तयार असल्याचे बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानेश्वर कर्पे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना म्हटले आहे.
संगमनेर मर्चंट बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राखीव जागेवर राजेंद्र वाकचौरे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. उद्योगपती राजेश मालपाणी यांचे प्राबल्य असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत काही पारंपारिक विरोधक देखील आत्तापर्यंत सभासदांनी निवडून दिले आहे.
संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उमेदवारी अर्जाचे छाननी झाल्यानंतर विद्यमान संचालक व अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर कर्पे यांनी सत्ताधाऱ्यांनी जर चार विरोधी उमेदवारांना संधी दिली तर बँकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू, कोरोना काळात व्यापाऱ्यांचे झालेले मोठे आर्थिक नुकसान, संस्थेचा निवडणुकीवर होणारा खर्च टळावा, यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
बँकेच्या स्थापनेपासून संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांची बँकेवर एकहाती सत्ता राहिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र राजेश मालपाणी यांनी देखील अपवाद वगळता बँकेचे धुरा आजतागायत आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. विरोधकांनी मालपाणी यांना सहकार शह देण्याचे प्रयत्न केल्याने बँकेच्या निवडणुकाही झाल्या असून संचालक मंडळ विरोधकांची देखील वर्णी लागलेली आहे.
व्यापाऱ्यांची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी, लाखो रुपयांचा खर्च वाचावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय साधला गेल्यास निवडणुक बिनविरोध होऊ शकते. याला कर्पे यांनी दुजोरा दिला आहे. पारंपरिक विरोधक असलेल्या ज्ञानेश्वर कर्पे यांच्यासह प्रकाश कलंत्री, राजेश करवा आणि संदीप जाजू या चार विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी एकमताने संचालक मंडळात सामावून घेतले तर बँकेचे निवडणूक बिनविरोध होऊ शकते अशी प्रतिक्रिया कर्पे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मालपाणी यांच्या मंडळाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.

