संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)-
राष्ट्रपतीपद हे देशाचे सर्वोच्च पद असून नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजातील आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपती महोदयांचाच आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे आहे.
आदिवासी, मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. समृद्ध लोकशाही असलेल्या या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले पाहिजे. ही सर्वसामान्य देशवासियांची रास्त भावना आहे, मात्र असे होताना दिसत नाही. याचे संपूर्ण देशाला वाईट वाटत असल्याचेही थोरात यांनी म्हटले आहे.

