अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगर दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यावेळी ते म्हणाले; नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. तुम्हाला काम पाहिजेत, म्हणून ते बोलतात. आम्हाला भरपूर काम आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही.
जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांना केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी या कामांचे टेंडर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निघाले आहे. केंद्र सरकारने पैसा देताना कधीही भेदभाव केला नाही. यासंदर्भात काही तक्रारी आल्या असतील तर त्या तपासून बघितल्या जातील, असे फडणवीस म्हणाले.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ३५७ गावांमध्ये कामांना सुरुवात होत आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला गती देण्याचा सूचना आपण दिल्या आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा दिसून येईल. शेतकऱ्यांना बारा तास वीज दिवसादेखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी नगरमध्ये अनेक विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

