महाराष्ट्र संवाद न्यूज
रविवार विशेष लेख
व्यवस्थेला पोखरून स्वत:चे खिसे भरणार्या पांढर्या पोषाखातल्या नव्या डाकूचा सीबीआयने नुकताच शोध लावला आहे. या डाकूने त्याच्या इलाख्यातील जंगलांची लयलूट केलीच, पण आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्याला शहरात घुसण्याचा मार्ग भाजपने आखून दिला. विरोधी पक्षांना त्रासदायक ठरलेल्या चार यंत्रणांमधील नाकोर्टिक ही आणखी एक संस्था बनली. आता अति झाल्यावर या डाकूवर छापेमारी सुरू झाली आहे. पांढर्या डगल्यातला हा इसम यंत्रणेला पोखरतो आहे, असा जाहीर आरोप करणार्या नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अतिआत्मविश्वासूंनी या डाकूला साथ दिली. खर्याचं खोटं करणार्या या इसमाचं नाव आहे समीर वानखेडे.
एका महत्वपूर्ण खात्याच्या विभागीय जबाबदारीतून समीरचा ‘अमीर’ कधी झाला हे कोणालाच कळलं नाही. यंत्रणेत ठराविक माणसं नेमण्याचा दिल्लीश्वरांच्या हट्टापायी हे सारं घडत गेलं आणि अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुजरातला नवं आंदण मिळालं. विरोधी पक्षांचे नेते या पांढर्या पोषाखातल्या लुटारु विषयी खूप काही सांगायचे. पण राज्याचं गृहखातं सांभाळणार्या फडणवीसांचे कान बंद होते. स्वत:च्या स्वार्थासाठी अशी माणसं यंत्रणेत ठेवण्याचा फडणवीस आणि अमितभाईंचा हातचा खेळ आहे. महाराष्ट्र राज्याचं काहीही झालं तरी त्यांना फिकीर नाही. विरोधी पक्षांना दाबणारी, त्यांच्या नेत्यांना ठरवून अडकवतील अशी माणसं यंत्रणेत असतील तर आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नसते, हे हेरणार्या दिल्लीतल्या अमित शहांनी आणि महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांनी असे असंख्य चोर यंत्रणेत आणून बसवले आहेत. त्यातल्या एका परमवीर नामक दरोडेखोराला साव बनवण्याचं पातक कसं केलं गेलं यातील वास्तव आपण गेल्या आठवड्यात मांडलं. त्याच माळेतल्या वानखेडेंच्या काळ्या उद्योगांचा पंचनामा करणं तितकंच आगत्याचं आहे. म्हातारी मेल्याच्या दु:खाहून काळ सोकावतो हे अत्यंत वाईट. वानखेडेंमुळे काळ सोकावू लागला आहे.
दीड वर्षापूर्वी म्हणजे २ आक्टोबर २०२१ या दिवशी मुंबईतल्या कार्डेलिया नामक क्रूजवर छापा पडतो काय आणि त्यात शाहरुख खान याच्या मुलाला ताब्यात घेतलं जातं काय, सारं अचंबित करणारी घटना होती. शाहरुख पुत्राला अटक झाल्याने हे प्रकरण हायप्रोफाईल बनणं स्वाभाविक होतं. एव्हाना इतरांना ताब्यात घेण्याची आवश्यकताच वानखेडे गँगला राहिली नव्हती. शाहरुख पुत्राला अटक केल्याचं दाखवून कोट्यवधी रुपयांची कमाई करायची असले उद्योग डोक्यात घोळत होते. अशा बड्या धेंडांना ताब्यात घ्यायचं, त्यांच्याविषयी जुजबी पुरावे निर्माण करायचे, ठरवलेल्या के. पी. गोसावी सारख्यांना एकसारखं पंच बनवायचं असल्या गोष्टी वानखेडेंच्या पचनी पडत होत्या. देशातल्या नव्या पिढीला बरबाद करणार्यांच्या मुसक्या आवळल्याच्या कारणास्तव तथाकथित देशप्रेमींकडून समीरचं कौतुक होत असताना काहीही संबंध नसलेल्या आर्यनला मात्र शिव्यांच्या लाखोल्या पडत होत्या.
मुंबईच्या मायानगरीत अशी उघड लूट करायची आणि याच लुटारुंचा साथीदार बनण्याचे पाप फडणवीस आणि भाजपच्या मंडळींनी केले. यामुळे आरोप खरे असूनही नवाब मलिक यांच्यासारख्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले. समीरबरोबरच के. पी. गोसावी आणि सॅम्युअल डिसुझा यांच्या या काळ्या उद्योगांचा भांडाफोड झाल्यापासून ही गँग लपून बसली होती. मनीष भानुशाली या आणखी एका बदमाशाने आर्यनला पकडण्यासाठी पुढाकार घेतला. हा भानुशाली तर भाजपचा पदाधिकारीच निघाला. त्याचे थेट मोदींबरोबरचे फोटो पाहून वानखेडे त्याला अधिकच भाळले. नार्कोटिक विभागाशी काहीही संबंध नसताना गोसावी, डिसोझा, भानुशाली आणि पाटील नामक व्यक्ती खुलेआम व्यवहार करायचे.
पण कमाईच्या हव्यासापोटी सहजरित्या आर्यनला ताब्यात घेण्याचे उद्योग त्यांनी केले. ज्या गोसावीची मदत नार्कोटिकचा वानखेडे घ्यायचा तो गासावी अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. तो सापडत नसल्याचं सांगणारे पोलीस याच गोसावीच्या मदतीने खोट्या गुन्ह्यांची नोंद करत होते. तेव्हाही पोलिसांच्या गृहविभागाचे प्रमुख हे फडणवीस होते. अनेक वर्ष हा गोसावी महाराष्ट्रातून फरार असल्याचं पोलीस सांगत. तोच गोसावी नार्कोटिकच्या कार्यालयात दिवसभर येरझार्या मारत असल्याची माहिती सीसीटीव्ही दाखवत होतं. वरील तिघांशिवाय आदिल उस्मानी, सच्चा पटेल, ईलू पठाण ही माणसंही दरवाजाआड वानखेडेसाठी काम करायची. शाहरुखचा मुलगा आर्यन हा सेलिब्रेटी असल्याने गोसावीने थेट नार्कोटिकच्या तुरुंगात जाऊन आर्यनसोबत सेल्फी घेतली आणि या घटनेचा भांडाफोड झाला. आरोपीबरोबरील गोसावीने घेतलेली सेल्फी वानखेडेला महाग पडली. 
या बदमाशांच्या हातून मोठ्या हस्तींना ताब्यात घ्यायचं त्यांच्याविरोधात खोटेनाटे आरोप करायचे आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळायचे हा गोरखधंदा वानखेडे कंपनीने सुरू केला होता. यात आरोपी मुस्लिम असला की कारवाई करणार्या वानखेडेंना शाबासक्या मिळायच्या. देशात वानखेडेंसारखा प्रामाणिक जणू कोणीच नाही, असा अविर्भाव या सगळ्यांचा असायचा. प्रामाणिकपणाच्या या बुरख्यात वानखेडेने इतकी कमाई केली की त्याची मोजदाज करण्याची वेळ सीबीआयवर येऊन पडली. २५ कोटींच्या मागणीसाठी आर्यनला अडकवलं जात असल्याचा आरोप तेव्हा नवाब मलिक यांनी केला होता. तो तेव्हाच खरा ठरला जेव्हा २५ कोटींची ही डील १८ कोटींवर येऊन ठेपली. यातील ५० लाखांचा बयाणा घेण्यासाठी गोसावी मुंबईत पोहोचला आणि अखेर ते पैसे नवी मुंबईत वाशीच्या पुलाखाली वानखेडेपर्यंत पोहोचवल्याचं उघड झालं.
इतकं घडूनही फडणवीस गँग नाकावरची माशी हटवत नव्हते. वानखेडे समर्थनाची राळ सुरूच होती. मलिक यांना गृहखातं सांभाळणार्या फडणवीसांनी तर साथ दिली नाहीच, उलट त्यांनाच खोटं ठरवत त्यांचं उट्टं काढलं. नार्कोटिकच्याही वरिष्ठांनी या आरोपांची फारशी दखल घेतली नाही. यावरून दिल्लीत राहून काहीजण वानखेडेला चालवत असल्याची शंका खरी ठरत होती. भाजपचा बोलघेवडे आणि बेताल आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर हद्दच गाठली होती. वानखेडेंची कारवाई योग्य ठरवत हे सगळे दिल्ली सरकारला शाबासकी देत होते.
वास्तविक ज्यांच्याकडे अंमली पदार्थांना अटकाव घालण्याची जबाबदारी होती त्या वानखेडे गँगहून चांगली कामगिरी राज्यातल्या पोलिसांनी केल्याचं उघड असताना भातखळकर खोटारडेपणा करत होते. आता वानखेडेंच्या मुसक्या आवळल्या जाऊ लागल्यापासून हे बोलघेवडे आमदार कोणत्या बिळात लपलेत हे कळत नाही. किरीट सोमय्या यांनी तर वानखेडेच्या घरी जाऊन त्यांचं उघड समर्थन केलं. समीर हा मागासवर्गीय असल्याने महाविकास आघाडीचं सरकार त्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप भाजपचे तमाम नेते करत होते. त्या मागासवर्गीय दाखल्याच्या सत्यतेविषयीही अनेक तक्रारी आजही येत आहेत. वानखेडेंकडेे महागडे कपडे, त्यांच्या महागड्या गाड्या, महागडी घड्याळं, लाखमोलाचे कमरपट्टे, अडीच लाखांची बुटं इतका पैसा लाखाच्या पगारातल्या अधिकार्याकडे येतो कुठून, अशी शंका वानखेडेंची बाजू घेणार्या भाजपच्या एकाही नेत्याला तेव्हा आली नाही. समीरचा भांडाफोड करणार्या प्रभाकर साईलचा संशयास्पदरित्या मृत्यू होणं यावरून हे प्रकरण कोणत्या पातळीचं आहे, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही.
अनील देशमुखांवर १०० कोटी मागितल्याचा खोटा आरोप ईडीला सकृतदर्शनी वाटतो, पाच लाखांच्या नवाब मलिक यांच्या जमीन खरेदीचं प्रकरण ईडीला महत्वाचं वाटतं. पण २५ कोटी मागून १८ कोटींमध्ये तडजोड करणार्या त्यातल्या ५० लाखांची रोकड स्वीकारणार्या वानखेडे आणि त्यांच्या गँगचं कृत्य ईडी अधिकार्यांना महत्वाचं वाटू नये? हे सारं पाहाता सत्तेच्या माणसांची फूस वानखेडेला होती, हे लपून राहू शकत नाही. प्रशासनाची इतकी इभ्रत गेली की आता फडणवीसपासून भातखळकर, किरीट, कंबोज यांची भूमिका काय हे देशाला कळलं पाहिजे.
प्रवीण पूरो, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

