महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी अशा सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी सोडण्याची चाचणीचा शुभारंभ होणार आहे.
पाच तालुक्यांचे लाभक्षेत्र असलेल्या या निळवंडे धरणासाठी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. प्रकल्प मार्गी लागावा म्हणून राज्यात सत्तेवर असलेल्या त्या-त्या काळातील सरकारचे सहकार्य मिळाले. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. पाण्याची असलेली प्रतिक्षा आता पाणी सोडण्याच्या चाचणीमुळे संपणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा क्षण महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
विखे पाटील म्हणाले, येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होणार असल्याने त्याचेही नियोजन या कार्यक्रमातून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मागील दोन दिवसांपासून अकोले, राहाता, संगमनेर या तालुक्यात कालव्यांची काम सुरू असलेल्या गावांना आपण भेटी देवून पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या भावनाही जाणून घेतल्या. कालव्याच्या कामातील त्रृटी दूर करण्याबाबत जलसंपदा महसूल विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल असा विश्वास व्यक्त करून उद्दिष्ट ठेवूनच ही काम पूर्ण करण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

