अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
दहशत अवैध व्यवसाय आणि गुंडागर्दीचा अड्डा म्हणून जोर्वे नाक्याची ओळख
महाराष्ट्र संवाद न्यूज
प्रतिनिधी – रविवारी रात्री शहरातील जोर्वे नाका परिसरात झालेली हाणामारीची घटना आणि त्यामुळे संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात झालेले तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत परिस्थिती नियंत्रणात ठेवली असली तरी या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. वादाला कारणीभूत ठरलेली अतिक्रमनेच नगर परिषदेच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळीच मोठ्या पोलीस फौज फाट्यासह नगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली कारवाई दुपारी बारा वाजेपर्यंत देखील सुरूच होती.
श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू होती. पोलिसांनी सुरुवातीलाच अतिक्रमण करण्यात आलेल्या भागाच्या दोन्ही बाजूने पोलीस बंदोबस्त तैनात केला त्यानंतर ही अतिक्रमणे काढण्यात आली. पथकाने केलेल्या या कारवाईचे संगमनेरात स्वागत होत आहे.
रविवारी रात्री जोर्वे नाका परिसरात गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून ग्रामीण भागातील युवकांना शंभर ते दीडशे जणांच्या टोळीने बेदम मारहाण करीत तलवार, चॉपर, काठ्या, लोखंडी रॉड, फाइटर याचा वापर करीत गंभीर जखमी केल्याची घटना संगमनेर शहरांमध्ये घडली. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हेगारांना कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
त्यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी सोमवारपासून जोरदार कारवाई सुरू करीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाऊले टाकली. घटनेनंतर संगमनेर शहरात विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विविध उपविभागातले पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, एसआरपीसह मोठा पोलीस फौजफाटा संगमनेरमधे तैनात करण्यात आला आहे. रात्रभर आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू होती.
तर दुसरीकडे मंगळवारी सकाळपासूनच संगमनेर नगरपालिकेने जोर्वे नाका परिसरात असलेली अनेक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तरुणांना गंभीर मारहाण करून दहशत निर्माण करणारे आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि अतिक्रमण करणाऱ्या विविध टपऱ्यांमध्ये, दुकानांमध्ये तसेच वाळू तस्करीमध्ये सुद्धा सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.
जोर्वे नाक्यावर विविध टपऱ्या आणि दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हा रस्ता अतिशय चिवळ करून ठेवला होता. त्यातच येथे हे रिक्षा आणि जीप थांबा बेकायदेशीररित्या करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. जुना पुणे नाशिक महामार्गावर असलेला हा नाका नेहमी चर्चेचा विषय ठरलेला आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी अशाच अनेक घटना झाल्या आहेत. वारंवार याकडे दुर्लक्ष केल्याने तेथील अतिक्रमण वाढत गेले. आज अतिक्रमण काढण्यासाठी ‘हाणामारीचे’ कारण घडावे लागले. मात्र यासाठी अशा कारणांची वाट न पाहता नगर परिषदेने शहरातील सर्वच भाग अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी आता जोर धरीत आहे.
छायाचित्रे : काशिनाथ गोसावी

