कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान
संगमनेर तालुक्यात सर्वांना सन्मानाची वागणूक
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संगमनेर तालुक्याचा सहकार वाटचाल करत असून आज सहकाराचे आदर्शवत मॉडेल हा तालुका ठरला आहे. कारखान्याच्या विकासात कामगारांचेही महत्त्वपूर्ण योगदान असून तालुक्यात शेतकरी, कामगार, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह सर्वांना सन्मान दिला जात असून तालुक्यातील वातावरण हे एक परिवारासारखे आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल व कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 29 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, नवनाथ आरगडे, रामदास वाघ, चंद्रकांत कडलग, संपतराव गोडगे, रमेश गुंजाळ, मीनानाथ वरपे, विनोद हासे, भाऊसाहेब शिंदे, संभाजी वाकचौरे, ॲड. सुहास आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, हौशीराम सोनवणे, किरण कानवडे ॲड. शरद गुंजाळ, विठ्ठल असावा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सेवानिवृत्ती हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. जीवनाचा महत्त्वाचा कालखंड आपण कारखान्याच्या सेवेत दिला असून कारखान्यानेही कायम कामगारांचा सन्मान केला आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत आपल्या सर्वांचा सहभाग असून तालुक्यात शांतता, सुसंस्कृतपणा व आनंदाचे वातावरण आहे. हे आपल्याला पुढे जपायचे आहे.
संगमनेरचा सहकार हा राज्याला दिशादर्शक ठरत असून साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ, बँक, शैक्षणिक संस्था या राज्यात अग्रक्रमांकाच्या आहेत. सहकारामुळे ग्रामीण भागात समृद्धी निर्माण झाली असून तालुका विकसित झाला आहे. आज तालुक्याचा आणि आपला राज्य पातळीवर देशपातळीवर सन्मान होतो आहे. यामध्ये सर्वांचाच मोलाचा सहभाग आहे. यापुढील काळातही सर्वांनी कार्यमग्न राहून स्वतःचे आरोग्य जपताना कुटुंबासह समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले
प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.
कामगारांच्या मुलांनी मानले आमदार थोरात यांचे आभार
सेवापूर्ती सोहळ्यात विविध कामगारांच्या उच्चशिक्षित मुलांनी आपल्या कुटुंबाच्या व आपल्या जीवनात झालेली प्रगती याविषयी बोलताना कारखाना व आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे आपल्याला पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठा मान सन्मान मिळत असून संगमनेरकर म्हणून सर्वत्र गौरव होतो आहे. याचे सर्व श्रेय आमदार थोरात यांच्या नेतृत्वाला असल्याचे उच्चशिक्षित असलेल्या शुभांगी वर्पे, राधाकिसन कानवडे, सुयोग कुळधरण व ऋषिकेश सातपुते यांनी सांगितले.

