Maharashtra sanvad news
By Anant Pangarkar
संगमनेर – कोरोना महामारीमुळे रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना काही दिवसांपूर्वी मुहूर्त लाभला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी महत्त्वाची शाखा असलेल्या एलसीबीसह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील दीर्घकाळ वतनदार बनलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदल्या करताना बहुतांशी वतनदारांना चांगले काम करतील या आशेने मनाजोगे पोलीस ठाणे देखील दिले. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्यासह उपविभागातील अनेक कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी अद्यापही हजर झालेले नाहीत. मनाप्रमाणे बदली होऊनही नव्या नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यास इच्छुक नसलेल्या कर्मचाऱ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तातडीने मुक्त करण्याची आवश्यकता आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना नव्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्याची आवश्यकता आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक संपल्याने शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दररोजच्या चोऱ्या नित्याचाच भाग झाल्या असून आता तर हाणामाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना नवीन विश्वासू कर्मचाऱ्यांची टीम सोबत घेऊन पोलीसिंग करावे लागणार आहे.
पोलीस अधीक्षकांनी बदल्यांचे आदेश काढून बरेच दिवस झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील जवळपास ९७५ कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या केल्या. त्यामुळे एकाच विभागात आणि एकाच पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष काम केलेल्या आणि अपप्रवृत्तींशी सलोख्याचे संबंध निर्माण झालेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना बदल्यांना सामोरे जावे लागले. बदल्यांना महिन्याचा कालावधी उलटत आला तरी बरेच कर्मचारी अद्यापही पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. पोलीस निरीक्षकांनी अशा वतनदार बनलेल्या कर्मचाऱ्यांना येथून कार्यमुक्त करत नव्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्याची गरज आहे.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी जुन्या जाणत्या माहितगार पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असली तरी यातून गुन्हेगारीचा बिमोड होत नसल्याचे समोर येताना दिसते. उपविभागात अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात नोकरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे परिसरात अनेक अपप्रवृत्ती, अवैध व्यवसायिकांशी हितसंबंध निर्माण झाले आहे. यातूनच कारवाईपूर्वीच संबंधितांना चाहूल लागत असल्याने पोलिसांच्या कारवाया म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखे ठरत आहे. अवैध धंद्यावरील कारवाया, कत्तलखान्यांवरील कारवाया, गुन्ह्यांचा प्रलंबित तपास हे याचे बोलके उदाहरण ठरते. हजारो लाखो रुपयांच्या मोहापायी येथील अनेक अधिकारी, कर्मचारी लाच लुचपतच्या जाळ्यात अलगद अडकले आहेत.
संगमनेरात यापूर्वीच्या काळात काही कर्तबगार अधिकारी, कर्मचारी आपल्या कामाचा ठसा उमटवून गेले. तर काहींनी पोलीस खात्याची दुकानदारीच करून टाकली असल्याचे प्रकार घडले आहे. यातील काहीजण एसीबीच्या जाळ्यात अडकले, काही जणांविरोधात आंदोलने झाली तर काहींनी केवळ आपला उद्देश साध्य करण्याचे काम केले. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. यातूनच पोलिसांवर हात उचलण्याचे देखील प्रकार या शहरात घडले. त्यातूनच पोलीस काहीच करत नाही ही विकृत मानसिकतादेखील गुन्हेगारांमध्ये वाढीस लागली. अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींकडे केलेले दुर्लक्ष आता चांगलेच अंगलट येऊ लागल्याचे जोर्वे नाका परिसरात घडलेल्या घटनेवरून समोर येत आहे.
संगमनेर शहरात सुरू असलेल्या सगळ्याच प्रकारचे अवैध धंदे (दारू, जुगार, मटका, गांजा विक्री, पांढऱ्या कपड्यातील पुढार्यांच्या लॉजेसवर सुरू असलेले अनैतिक व्यवसाय, बेकायदेशीर कत्तलखाने, बंदी असलेला गुटखा विक्री आदी) यामुळे पोलीस यंत्रणा पुरती बदनाम झाली आहे. त्यामुळे अशा व्यवसायिकांशी येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हितसंबंध दडले आहेत. अशा हितसंबंधातून देखील तणाव निर्माण होण्याची अथवा गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असल्याचा चर्चा देखील वारंवार होतात. त्यामुळे बदल्या होऊन देखील शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यास तयार नाहीत. या मागचे नेमके गौडबंगाल काय? या पोलिस ठाण्यात अशी कोणती चुंबकीय शक्ती कार्यरत आहे की ज्यामुळे कर्मचाऱ्यांना हे पोलीस ठाणे सोडूशी वाटत नाही अथवा पुन्हा येथे येण्याची इच्छा निर्माण होते, याचा नव्या पोलीस निरीक्षकांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा नव्या पोलीस निरीक्षकांना देखील काम करताना एखाद्या ‘टोळक्या’च्या माध्यमातून बदनामीचा सामना करावी लागण्याची चिन्हे आहेत.

