महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर- कोरोनासारखे संकटे आली, सोशल माध्यमांची स्पर्धा वाढली तरी मुद्रित माध्यमांचे महत्व कधीही कमी होणार नाही. मात्र वृत्तपत्रांनी उथळ बातम्या देण्याऐवजी विश्लेषणात्मक लेखन आपल्या वृत्तपत्रातून करावे. ती काळाची गरज आहे. सध्या राजकारणाचा दर्जा झपाट्याने घसरला आहे अशावेळी माध्यमांनी सवंग लोकप्रियतेसाठी धावणार्या वाचाळ नेत्यांना माईक व लेखनीबंदी करावी तरच माध्यमांचा दर्जा टिकवून राहील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने रविवारी संगमनेरात संपादक राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. वि. ल. धारूकर, संघटनेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे, अॅड. इलियास खान, डॉ. हेमंत जोशी, डॉ. नामदेवराव गुंजाळ, संपादीका सुशीला हासे, जिल्हाध्यक्ष मनोज आगे, सचिव नरेंद्र लचके, संपादक जयपाल पाटील तर दुसर्या सत्रात प्रमुख पाहुणे आमदार सत्यजीत तांबे उपस्थित होेते.
आ. थोरात म्हणाले, आज एखादी संघटना स्थापन करणे व ती चालविणे महाकठीण काम आहे. परंतू संपादक किसन भाऊ हासे संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून छोट्या वृत्तपत्राचे नेतृत्व जिद्दीने करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या घडामोडी व जनतेचे प्रश्न सरकारपुढे मांडण्याचे काम छोटी वृत्तपत्रे करतात. या छोट्या वृत्तपत्रांच्या अनेक समस्या आहे. संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर हासे नेहमी संघर्ष करीत असतात. आमचा त्यांच्या संघर्षाला नेहमी पाठिंबा असतो.
वृत्तपत्रे हे उथळ बातम्यांपेक्षा सविस्तर व विश्लेषणात्मक घटना जनतेपर्यंत पोहचवित असल्यामुळे त्यांचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. वृत्तपत्रांनी काळानरूप बदल करून बातम्यांबरोबरच विश्लेषणात्मक लेखन अग्रक्रमाणे करावे अशी अपेक्षा करत संपादकांनी आपल्या प्रश्न संदर्भात आपआपल्या जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींकडे, प्रशासनाकडे सविस्तर निवेदन द्यावे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून विधिमंडळात या प्रश्नावर सरकारला जाब विचारू. राज्यातील विविध भागातून संपादक संगमनेरात परिषदेसाठी आले होते. हासे यांच्या माध्यमातून या संपादकांशी आपल्याला हितगूज साधता आले असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
संपादक परिषदेचे प्रास्तविक हासे यांनी करतांना सांगितले की, राज्यात सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त छोटी वृत्तपत्रे प्रकाशित होतात. सरकारचे ध्येय, धोरण, योजना ग्रामिण भागातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भांडवली वृत्तपत्रांपेक्षा हे छोटे वृत्तपत्र करीत असतात मात्र शासन जाहिरात वाटप धोरणात याच छोट्या वृत्तपत्रांवर अन्याय करते. जाचक नियम, अटी लावून या छोट्या वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्याचे काम सरकारकडून केले जाते. त्यामुळे न्याय हक्कांसाठी संघटीतपणे मुकाबला करण्यासाठी संपादक व पत्रकार सेवा संघ सातत्याने लढा देत आहे. अधिस्विकृती कमिटीमध्येही जाणीवपूर्वक छोट्या वृत्तपत्रांवर अन्याय केला जातो. हा अन्याय दुर करण्यासाठी यापुढे आपल्याला अधिक जोमाने लढावे लागेल अशी भावना व्यक्त केली.
धारूरकर म्हणाले, छोटी वृत्तपत्रे म्हणजे ग्रामीण भागाचा आरसा असतात. ग्रामीण भागातील छोटे-मोठे प्रश्न ऐरणीवरून आणून त्यांचे निरसन करण्यासाठी शासनावर दबाव आणण्याचे काम छोटी वृत्तपत्र करीत असतात. एक छोटी बातमी सुद्धा जगाच्या कानाकोपर्यात जाऊन खळबळ उडवू शकते. छोट्या वृत्तपत्रांसमोर, तंत्रज्ञान, मुद्रण, वितरण, जाहीरात हे मुख्य प्रश्न असले तरी तुम्ही समाजाचे छोटे-मोठे प्रश्न मांडल्यास समाज आपल्या पाठीशी उभा राहील.
यावेळी आ. सत्यजीत तांबे यांनी छोट्या वृत्तपत्रांचे महत्त्व विशद करत त्यांच्या प्रश्नांसाठी आपण शासन दरबारी लढा देऊ असे आश्वासन दिले. दुर्गाताई तांबे, बाळासाहेब आंबेकर, मनोज आगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवावार्ताचे कार्यकारी संपादक सुदीप हासे यांनी केले तर आभार नरेंद्र लचके यांनी मानले.
यावेळी केशवराव तुपे – छ. संभाजीनगर, प्रफुल्ल नेवे -जळगाव, अॅड. इलियास खान – जालना, पीआर पाटील -लातूर, विजय लक्ष्मण पवार – कोल्हापूर, धनश्री पालांडे – रत्नागिरी, चंद्रकांत खंडेलवाल- गोंदिया, राजेंद्र दणके – पुणे, विलास डोळसे -बीड, उद्धव बाबर – सातार, हेमंत जोशी – पालघर, अनिरूद्ध बडवे – सोलापूर, उत्तम काळे – परभणी, मधुकर बावणे – नागपूर, हिवारज उके – भंडारा, नरेश गुजराथी -नाशिक व इतर जिल्ह्यातील संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

