महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या मारहाण प्रकरणी संगमनेर करांना शांततेचे आवाहन केले आहे. या संदर्भातील त्यांचे एक पत्र मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
संगमनेरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून यातील गुन्हेगारांना परत शिक्षा झाली पाहिजे प्रशासन देखील या संदर्भात काळजी घेत आहे मात्र या घटनेला जातीय धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये गुन्हेगाराला जात धर्म नसतो जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी या पत्राच्या माध्यमातून करताना संगमनेरकरांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. 
थोरात यांनी या पत्रात नेमके काय म्हटले आहे ते महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांसाठी देत आहोत…
विनम्र आवाहन
सस्नेह नमस्कार,
नाक्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे, प्रशासनही याची काळजी घेत आहे, असे दिसते. परंतु त्या घटनेला जातीय, धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत.
संगमनेरमध्ये असलेले विकासाचे आणि बंधूभावाचे वातावरण कौतुकास्पद आहे, आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. मात्र हे चांगले वातावरण बिघडवून, संगमनेरला अस्थिर करण्याचा प्रयत्नही सुरू आहे, हे नाकारता येणार नाही, याच घटकांकडून जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात आहे, मात्र यामागे दडलेला त्यांचा राजकीय हेतू आपणासही ठाऊक आहे.
एखाद्या घटनेला धार्मिक किंवा सामाजिक रंग देऊन संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था बिघडवू देऊ नका, आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने मी आपणास करतो.
आपला
बाळासाहेब थोरात, विधानसभा सदस्य.

