महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे. अद्यापही काही आरोपींचा शोध सुरू असून यापुढे कोणत्याही गुन्ह्यातील ‘गुन्हेगाराला’ पाठीशी घातले जाणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. या उपविभागात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार आता तडीपार होतील किंवा तुरुंगात असतील, अशा पद्धतीने पोलीस कारवाई होणार असल्याचे संकेत संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले आहे.
वाघचौरे यांनी संगमनेर उपविभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर रविवारी प्रथमत:च पत्रकार परिषद घेत आपल्या कामाची पद्धत विशद केली. नागपूर, भुसावळ येथे केलेल्या लक्षवेधी कामासंदर्भात माहिती देताना त्यांनी या संगमनेर उपविभागात देखील काही वेगळे प्रयोग करून गुन्हेगारीचा बिमोड करणार असल्याचे स्पष्ट केले. गुन्ह्यांच्या शोध लावण्यासोबतच गुन्हेगारीचा समूळ नायनाट करण्यासाठी आपले प्राधान्य असेल असे ते म्हणाले.
नागपूरमध्ये बड्या धेडांचा समावेश असलेल्या भूमाफिया टोळीवर कारवाई केली आहे. नऊ वर्षानंतर देखील ही टोळी अद्यापही तुरुंगात असून अनेक छोटे-मोठे भूखंड आपण संबंधितांना परत मिळवून दिले. भुसावळ सारख्या शहरातही गुन्हेगारी मोडीत काढत ऐंशीहून अधिक गुन्हेगारांना तडीपार केले. संगमनेरमध्ये देखील काम करताना आपण प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. संगमनेर उपविभागातील संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी व अकोले तालुक्यातील अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यातील दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्याचे काम चालू असून अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गुन्हेगार कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई अटळ आहे.
शहरात बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून विनापरवानगी फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केली जातील. शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, दुचाकी चोरी रोखण्यासाठी देखील पोलीस सतर्क असतील. अवैध वाहतूक विना क्रमांकाची वाहने मोठ्या आवाजातील सायलेन्सर लावून भरधाव वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाया केल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पथक नेमले जाईल. या विभागात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी सतर्क राहणार असल्याचे वाघचौरे यांनी म्हटले आहे.

