महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती संभाजीनगर – राज्यात वारंवार धार्मिक जातीय तणावाच्या घटना समोर येत आहे. यातील एक घटना मंगळवारी संगमनेरमध्ये तर दुसरी घटना कोल्हापूरमध्ये घडली. राज्य सरकारचा अशा घटनांना प्रोत्साहन असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.
शरद पवार यांनी संगमनेर आणि कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनेवर छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भाष्य केले. मंगळवारी संगमनेर नजीकच्या समनापुरमध्ये दोन गटात दगडफेकीचा प्रकार घडला होता. तर कोल्हापूरमध्ये औरंगजेबाच्या फोटोवरून तणाव निर्माण झाला. या दोन्ही घटनांवर पवार यांनी भाष्य केले.
पवार म्हणाले राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगलसदृश्य घटना घडत आहे. मात्र या घटना त्या-त्या परिसरापुरत्या मर्यादित राहिल्या असल्या तरी हे जाणून-बुजून घडविले जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल हे बघितले जात आहे. राज्य सरकारकडूनच अशा घटनांना धार्मिक स्वरूप दिले जाते.
संगमनेर व कोल्हापूरमध्ये सामाजिक तणावाच्या घटना समोर आल्या असून कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो त्यावरून लगेच रस्त्यावर उतरत अशा घटनांना धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही दोन समाजात दोन जातींमध्ये कटूता निर्माण करून राजकारण करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

