महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – एकीकडे वर्षाच्या परिश्रमातून सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी येत असताना सर्वांनीच जल्लोष करावा असा दिवस असताना दुसरीकडे मात्र काही लोक संगमनेरमध्ये दंगल कशी होईल, येथील वातावरण खराब कसं होईल याचा हेतू पुरस्सर प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.
निळवंडे येथे तळेगाव गट व संगमनेर तालुक्यासह दुष्काळी 182 गावांच्यावतीने बुधवारी आयोजित जलपूजन कार्यक्रमप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अविनाश सोनवणे, जगन्नाथ घुगरकर आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कोणी गुन्हा केला असेल तर त्याला इतकी कडक शिक्षा व्हायला हवी ती पुन्हा तोच गुन्हा करण्याची त्याची वासना व्हायला नको. मात्र तालुक्यातील अशा विषयाचे भांडवल करून त्याकडे संधी म्हणून बघत मोर्चे करून त्या माध्यमातून येथील वातावरण, बाजारपेठेचे वातावरण बिघडवून टाकायचं. मोर्चादरम्यान कोणतेही अनुचित घटना घडली नाही हे अभिनंदनीय होते. मात्र दंगल घडवायचीच या हेतूने मोर्चामध्ये काही लोक सोडले होते. त्यासाठी जे पाहिजे ते करा अशा सूचना त्यांना दिल्या गेल्या होत्या. संगमनेरचा जावई असल्याचे सांगणाऱ्याने येथील वातावरण बिघडविण्याचे काम केले.
सकाळी-सकाळी दिल्ली नाक्यावरील दुकान फोडले. परत जाताना समनापुरमध्ये काहीही संबंध नसणाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्यातून दंगल घडावी हा त्यामागचा हेतू होता. संगमनेरवाले आपल्याला आवरत नाही, ते मोडत नाही, उलट उभारी घेतात. त्यामुळे आता उलट्या पद्धतीने जाऊ असा विचार करणारे काही लोक येथील जनतेचे संसार मोडायला निघाले आहे. संगमनेरचे चांगले पाहवत नाही म्हणून असले उद्योग हेतू पूरस्सर सुरू आहे. काही लोक हे जाणीवपूर्वक करत आहेत.
कोणी चुकत असेल तर त्याला जरूर शिक्षा झाली पाहिजे मात्र त्यासाठी सगळ्या समाजाला दोष देणे योग्य नाही. विकासाचे काम त्यांना करायचे नाही. येथील विकास त्यांना बघवत नाही. त्यामुळे मते मिळविण्यासाठी आता सोपा उपाय म्हणून जातीचे धर्माचे राजकारण सुरू झाले आहे. आपल्याला सगळ्या पद्धतीने मोडण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीत आपला तालुका असा सांभाळा की ज्याचा आदर्श राज्यात सर्वत्र घेतला गेला पाहिजे.
अशा विचारांपासून आपल्याला राज्याला, देशाला जपायचे आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात कोल्हापूर, शेवगाव, बाळापुर अकोला, अमरावती आदी ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण केले गेले आहे. भांडणे लावा, दंगली घडवा, आपोआप मते फिरतील आणि आपण पुन्हा सत्तेवर जाऊ एवढाच उपाय आता त्यांच्याकडे उरला असल्याची टिका थोरात यांनी केली.
गणेशच्या निवडणुकीत सहभाग
तुम्ही इकडे मोडायला येता आम्ही तिकडे घडवायला जात आहोत. गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस आपल्याला आणावा लागतो. जेथे कारखाना चालतो तेथे चैतन्य निर्माण होते. आपल्यासारखे चैतन्य तेथे निर्माण व्हावे यासाठी, आपण एकीकडे गणेश घडवायला चाललो आहोत. तर दुसरीकडे संगमनेरमधील ‘सुकून’ ते मोडायला, पेटवायला निघाले आहे.


