आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्राचा विपर्यास करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम काही रिकामी टाळकी करत आहे
भाजपने स्वतःच्या नावाने थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी करावी सकल हिंदू समाज व हिंदू युवकांचे नाव घेऊ नये आम्ही असा कोणताही ठेका संगमनेर भाजपला दिलेला नाही
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – हिंदू समाजावरील वाढते अत्याचार, महिला, शेतकरी, व्यापारी यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गोरक्षणाच्या मुद्द्यावरून संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने विराट मोर्चा पार पडला. राजकीय पक्ष विरहित हा मोर्चा असल्याने यात सर्वपक्षीय हिंदुत्ववादी पदाधिकारी, कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. मात्र मोर्चाच्या यशस्वीततेनंतर त्याचे श्रेय घेण्याचा तसेच त्याला राजकीय वळण देण्याचा भारतीय जनता पक्षाने केविलवाना प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी केला.
मोर्चाच्या यशस्वीतेनंतर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये असे स्पष्ट करत कतारी यांनी म्हटले आहे की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पत्राचा विपर्यास करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम काही रिकामी टाळकी करत आहे. आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून थोरात यांचं बेरजेचं राजकारण तालुक्यात सर्वच जण ओळखतात. सर्वसमावेशक धोरण असल्याने राज्यातील इतर ठिकाणासारखं आपल्या मतदारसंघात धार्मिक दंगलीचे वातावरण होऊ नये किंवा तशी घटना घडू नये आणि असे काही घडवू इच्छिणाऱ्या लोकांना ईशारा देण्यासाठी आमदार थोरात यांनी पत्र लिहिले असावे व त्या संदर्भात वक्तव्य केले असावे. आपला मतदार संघ शांत व तणाव रहित राहावा असे लोकप्रतिनिधीला वाटले तर त्यात वावगे नाही. मात्र आता त्या पत्राचे देखील भाजपकडून भांडवल केले जात आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पत्राला उत्तर देताना भाजपने मागणी केली की त्यांनी हिंदूंची माफी मागावी. आम्ही कोणत्याही हिंदू समाजातील व्यक्तीने अशी मागणी केलेली नाही. भाजपने ही मागणी वैयक्तिक स्वरुपात राजकीय हेतू ठेवून केली असेल तर भाजपने स्वतःच्या नावाने मागणी करावी सकल हिंदू समाज व हिंदू युवकांचे नाव घेऊ नये आम्ही असा कोणताही ठेका संगमनेर भाजपला दिलेला नाही, सदर मोर्चामध्ये येताना आम्ही आमच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते घरातील सदस्य मित्रपरिवार सर्वांना सोबत घेऊन आलो, कारण सदर भगवा मोर्चा हा राजकारण विरहित होता कोणत्याही विशिष्ट समाजाला नाव ठेवण्यासाठी सदर मोर्चा नव्हता, संगमनेरमध्ये गेले अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लिम एकत्र राहत आहे, भविष्यातही एकत्र राहतील. चुकीच्या व गैरवर्तन करणाऱ्या मुस्लिमांचे समर्थन आम्हीही करणार नाही, परंतु जोर्वे नाक्यातील काही मुस्लिम युवकांनी चूक केली असेल तर याचा अर्थ संगमनेरमधील सर्वच मुस्लिम वाईट आहे, असं होत नाही म्हणून भाजपने आता भगवा मोर्चाचं राजकारण थांबवावं व संगमनेर मधील हिंदू-मुस्लिम बांधवांना शांततेने जगू द्यावे.
सदर भगवा मोर्चाचं आयोजन नियोजन कोणत्याही विशिष्ट संघटनेने अथवा पक्षाने केले नाही, हिंदुत्ववादी विचारांच्या प्रभावाने प्रभावित हिंदुत्ववादी युवक एकत्र आले. त्यांनीच भगवा मोर्चाचे नियोजन केलं व सर्व हिंदू समाजाला त्यांची भूमिका पटली म्हणून हिंदू समाजातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी युवक एकत्र आले.
हिंदू अत्याचारा विरोधात तसेच जोर्वे नाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे बाधित झालेल्या युवा वर्गाला धीर देणे, ग्रामीण भागातील हिंदूंच्या पाठीशी आम्ही सर्व एकजूटपणे उभे आहोत, हे दाखवण्यासाठी सर्वचजण या मोर्चात सहभागी झाले परंतु ह्या मोर्चाचे श्रेय घेण्यासाठी तसेच राजकीय वळण देण्यासाठी भाजपा केविलवाणा प्रयत्न करत आहे.
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत असतांना देखिल गोहत्या होत असतील, लव्ह जिहादचे प्रकरण वाढत असतील, धार्मिक तेढ वाढत असेल तर हे भाजपचे अपयश आहे. की सत्तेत टिकून राहण्यासाठीचे षडयंत्र? असा देखील प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
कडवट हिंदुत्वाचा विचार करायचाच झाला आणि केवळ मुस्लिम द्वेष करायचा असेल तर भाजपामध्ये देखिल अनेक मुस्लिम कार्यकर्ते, आहेत. त्यांच्याबद्दल संगमनेर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, जिहाद डोक्यात ठेवणारा मुस्लिम हा नक्कीच हिंदुत्वाचा आणि हिंदुस्थानचा शत्रू आहे. मात्र केवळ राजकीय फायद्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना, हातावर पोट असणाऱ्यांना दंगलीच्या झळा लागू नये असेही आपले वैयक्तिक मत असल्याचे अमरभाऊ कतारी यांनी म्हटले आहे.

