महाराष्ट्र संवाद न्यूज
आमच्या पोळ्या करणाऱ्या बाईला कणिक भिजवता भिजवता मध्येच फोन आला म्हणून हात धुवून त्या फोनवर दोन-तीन मिनिटं बोलल्या आणि मग पुढील बराच वेळ भिंतीकडे तोंड करून WhatsApp वर मेसेजेसची देवाणघेवाण करत होत्या. दहा-बारा मिनिटं होऊनही त्यांचं परत कामाकडे वळण्याचं चिन्ह दिसेना, तेव्हा आजींनी त्यांना विचारलं, “इंदू, काय झालं गं, सर्व ठीक आहे ना?”
इंदूने चेहरा आजीकडे केला तेव्हा कळलं की डोळ्यातून पाणी वाहत होतं. पुढील काही वेळात कळलं ते असं, त्यांच्या लातूर येथे राहणाऱ्या मावस भावाच्या साडेचार वर्षाच्या मुलाला ऑपरेशनच्यावेळी भूल दिल्यानंतर झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे त्याच्या फुफुसांवर परिणाम होऊन त्याचं श्वसन धोकादायक पातळीवर कमी झालं होतं.
त्या जोडप्याचं एक मूल या वर्षभर आधीच दगावलं होतं, आणि हे दुसरं एकमेव आता मृत्यूशी झगडत होतं. उपचार म्हणून आवश्यक असलेले एक इंजेक्शन लातूरमध्ये कुठेही उपलब्ध नव्हतं. पुढील २४ तासांत ते इंजेक्शन मिळालं तर कदाचित मूल वाचू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
पुढील अर्ध्या तासात मी, माझ्या पत्नीने, मुलाने, सुनेने पुण्यात विविध ठिकाणी चौकशी करून एखाद्या हॉस्पिटल, फार्मसीमध्ये तरी ते उपलब्ध आहे का याची चौकशी केली. दुर्दैवाने पुण्यात ते कुठेही उपलब्ध नव्हते.
कधीकाळी आमच्या शेजारी असलेल्या आणि घनिष्ट मैत्रीण अशा एका टाटा हॉस्पिटलच्या निवृत्त डॉक्टरांना पत्नीने फोन केला, आणि काही मदत होऊ शकेल का हे विचारलं. त्यांनी पाचच मिनिटांत चौकशी करून कळवलं की मुंबईत महालक्ष्मी येथील कर्करोग अंतिम उपचार चॅरिटेबल केंद्रामार्फत हे औषध कदाचित मिळू शकेल. पण कुणीतरी ते तिथून घेऊन लातूरला कुरियर करावं लागेल.
मी ‘आषाढी उद्योजक समूहा’च्या विनय सामंत यांना फोन केला आणि कोणी या औषधाच्या कुरियरसाठी मदत करू शकेल का हे विचारलं. ते ‘प्रयत्न करतो’ म्हणाले.
काही मिनिटांतच विनयच्या सांगण्यावरून आषाढीच्याच संदीप कर्हाडकर यांनी मला फोन केला. ‘एकाला फोन केलाय, ते इतर कोणाला फोन करणार आहेत, पाहूया काही जमतं आहे का’, असं म्हणाले.
पुढील दहा मिनिटात मला मुंबईतील अनिकेत जाधव या तरुणाचा फोन आला. त्यांनी सांगितलं की “तुम्हाला काही औषध अर्जंटली लातूरला कुरियर करायचं आहे असं कळालं, औषध कुठून घ्यायचं आहे आणि कुठे पाठवायचं आहे त्याची माहिती मला या WhatsApp नंबरवर कळवा. मी स्वतः जाऊन औषध घेऊन कुरिअर करीन.”
एव्हाना मी इंदूला रुग्णाचे नाव, रुग्णाच्या पालकांचे नाव, डॉक्टरचे नाव, हॉस्पिटलचे नाव आणि फोन नंबर्स ही माहिती विचारून घेतली होती. ही सर्व माहिती मी अनिकेत यांना कळवली. आणि महालक्ष्मी येथील ‘कर्करोग अंतिम उपचार केंद्रा’ची उपलब्ध माहितीही कळवली.
अर्ध्याच तासात त्यांचा मला तिथून फोन आला, आणि त्यांनी सांगितलं की तेथील नर्सने औषध मागवले आहे, पण ते येईपर्यंत वेळ लागणार आहे, थांबावं लागेल. मी थांबतो, औषध घेऊनच येथून निघेन.
ही सकाळी साडेदहा वाजताची गोष्ट. त्यानंतर दर अर्ध्या तासाने त्यांचा ‘अद्याप औषध आलं नाही’ असा फोन येत होता.
दिवसभर तेथे थांबल्यानंतर जवळजवळ ६ वाजता अनिकेत यांनी मला सांगितलं की “सात वाजता कुरियर ऑफिस बंद होईल म्हणून मी चौकशी करून येतो आणि परत हॉस्पिटलला येतो.’ त्यांनी साडेसहा वाजता मला सांगितलं की ‘एक कुरिअर सव्वासात पर्यंत औषध मिळालं तर तीन दिवसांत पोचवण्याची हमी घेतो आहे, दुसरा कुरिअर कमी चार्ज करतो आहे पण वेळेची हमी घेत नाही. काय करू?”
मी त्यांना सांगितलं की “३ दिवस म्हणजे खूप उशीर होईल, रुग्णाला तातडीने औषधाची गरज आहे, अन्य काही मार्ग असेल तर शोधतो. औषध ताब्यात घेण्याआधी कृपया पुन्हा एकदा फोन करा.”
आमचे ड्रायव्हर मंगेश यांचा मावसभाऊ स्वप्नील प्रतीक्षानगर येथे राहतो हे मला माहिती होतं. मंगेशने त्याला फोन करून विचारलं की तो ‘अनिकेतकडून औषध ताब्यात घेऊन, कुर्ला बस डेपोला जाऊन तेथून लातूरला प्रवासासाठी जाणाऱ्या कोणत्याही बस वाहकाबरोबर औषध पाठवू शकेल का ?’
त्याने होकार दिल्यावर त्याचा संपर्क क्रमांक अनिकेतला कळवला. इकडे पावणे ७ वाजेपर्यंतही औषध आलेलं नव्हतं म्हणून नर्सने अनिकेत यांना दादरच्या स्टॉकिस्टचा पत्ता दिला आणि तिथूनच औषध घेऊन जाण्यास सांगितलं. “पैसे किती द्यायचे आहेत” असे विचारल्यावर नर्सने सांगितलं की तुमच्या डॉक्टर मैत्रिणीने पैसे दिलेले आहेत, फक्त औषध घेऊन जायचं आहे.
दिवसभर डोंबिवलीला जाणं रद्द करून महालक्ष्मीला थांबलेल्या अनिकेत यांनी दादर येथे जाऊन ते औषध ताब्यात घेतलं आणि सायन स्टेशनबाहेर स्वप्नीलच्या ताब्यात दिलं.
मी त्यांना मनापासून खूप धन्यवाद दिले, त्यांना त्यांच्या वेळेची आर्थिक भरपाई म्हणून काही पैसे पाठवू इच्छित असल्याचं सांगितलं आणि त्यांचा फोन नंबर जीपे किंवा पेटीएमवर सापडत नसल्याने काही अन्य मार्गाने हे करू शकतो का असं विचारलं.
त्यांनी अत्यंत नम्रपणे, गोड बोलून, “सर, त्याची अजिबात आवश्यकता नाही, मी पैशासाठी हे काम केलं नाही,” म्हंटलं. मी म्हंटलं “अहो तुम्ही इतक्या उशीरा डोंबिवलीला घरी पोहोचणार आहात, मला थोडी तरी परतफेड करू द्या!”
त्यांनी जे सांगितलं त्याने मी थक्क झालो, “सर, मी डोंबिवलीला राहत नाही, माझी बायको तिथे एका हॉस्पिटलमध्ये नर्स आहे, तिला घेऊन मग मी लालबागला घरी जाईन. खरंच पैसे नकोत, फक्त ओळख ठेवा!”
रात्री साडेआठ वाजता स्वप्नीलचा फोन आला, त्याने औषध ज्या ड्रायव्हर बरोबर पाठवलं, त्यांचं नाव, गाडी नंबर आणि फोन नंबर ही माहिती पाठवली. मी लगेच ती इंदूला आणि तिने तिच्या भावाला कळवली. (स्वप्नीलला देखील मी पैसे देऊ केले, त्यानेही ते नाकारले, “नको साहेब, ते पोरगं वाचलं तर तेवढंच मला पुरेसं आहे!”)
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता इंदू सांगायला आली: “साहेब, इंजेक्शन मिळालं, पोरगं वाचलं!”
त्याचवेळी मुंबईच्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला, ‘औषध पोहोचलं का, उपयोग झाला का’, हे विचारायला. मी खूप आनंदाने त्यांना धन्यवाद दिले. ‘औषधाचे पैसे पाठवतो आहे, कृपया किती ते कळवा’ असं सांगितलं.
“मी हे पैसे अजिबात घेणार नाही, तुम्ही दोघांनी एका सत्कार्यात मला सहभागी होऊ दिलंत हेच चांगलं, that was my yesterday’s good deed, I am very happy my prayer worked!”
संदीप कर्हाडकर यांना धन्यवाद दिले तेव्हा त्यांनी सांगितलं की अनिकेतला ते प्रत्यक्ष ओळखतही नाहीत! “तुम्ही -> विनय -> संदीप (मी) -> गजानन महिंद्रकर -> अनिकेत -> स्वप्नील अशी human chain of goodness उभी केली आणि it worked. अनिकेतने फक्त कुणाला तरी औषधाची तातडीची गरज आहे आणि त्याला ते काम मिळालं, म्हणून मनस्वी स्वीकारलं आणि केलं. यात आषाढीची सत्शक्ती आणि त्या रुग्णाचे प्रारब्ध काम करून गेलं, आणि आपल्याला सर्वांचे व ईश्वराचे शुभाशीर्वाद ! अजून काय पाहिजे ???”
म्हणूनच म्हणावंसं वाटतं, माणूसकी अजून जिवंत आहे!
अनामिक
(साभार – समाज माध्यम)
‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ बातम्यासोबतच अशा सकारात्मक विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे आपल्याकडेही काही असे अनुभव असतील तर पाठवा. स्वतःचे अनुभव असतील तर नावासह प्रसिद्ध केले जातील. संपर्क – WhatsApp No. ७५८८६००९५०

