महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले | राजेंद्र जाधव
महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ओळख असलेले ५४ शेकरू हरिश्चद्रगड अभयारण्यात आढळून आले यात यात प्रामुख्याने कोथळे, पाचनई, आंबित, कुमशेत या परिसरातील जंगलात त्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले.
तर पंधरा दिवसांच्या प्रगणनेत अकोले तालुक्यातील राजूर -हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुंची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे प्रगणनेत दिसून आले वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याकडुन या शेकरूंची मोजतात करण्यात आली. मोजणी दरम्यान ५४ शेकरूनी वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षरीत्या दर्शन दिले. 
राजूर वनरिश्रेत्रात येणाऱ्या तीन वनपरिमंडळातील जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य हे शेकरुच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरुच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत राबविला जातो.
उपवनसंरक्षक राजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या आदेशान्वये राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या पथकातील वनपाल शंकर लांडे, हनुमंता इदे, नवनाथ गांगोडे, श्रीमती खाडे, वनरक्षक गोविंद आधार, प्रकाश आढळ, वनरक्षक दत्तू डोंबाळे, चंद्रकांत चव्हाण, अविनाश भोये, निलेश पिचड, गंगाराम पालवी, प्रविण साळुंखे यांनी कोंथळे, लव्हाळी, कोतुळ, अंबित, तळे, पाचनई कुमशेत या भागांतील जंगलांमध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या शेकरुसह व त्यांच्या घरट्याचे निरीक्षण केले.
या दरम्यान त्यांना ५४ शेकरु आढळून आले. तर चांदा, करंबु, आळीव, करप, जांभूळ हिरडा, कोभोळ, आवळा, उबर, येहळा, गेळ, शंदरी, लोध, गुळचाई, पिंपर, अशिद, लांद, आंबा या झाडांना शेकरूंची पसंती असल्याचे पुढे आले. एकूण १७ देवरायांचे संवर्धन आदिवासीच्या मदतीने केले जात असून, शेकरूंचे या ठिकाणी वास्तव्य आहे. तसेच या वर्षी अभयारण्यात शेकरुनी बांधलेल्या घरट्याची संख्या २६० आढळून आल्याने नवीन घरट्यांची संख्या वाढलेली दिसून आली.
जुने १८५ घरटे आढळून आली. तर ६१ घरटे सोडून दिल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोडलेल्या जुन्या घरट्याचा आकडा जास्त होता. मात्र यावर्षी वापरात असलेल्या जुन्या घरट्याचा आकडा त्या तुलनेत जास्त असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे. यामुळे शेकरुचा या अभयारण्य अधिवास समृद्ध होत असल्याचे मानले आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्षरित्या केवळ ४७ शेकरु दिसले होते.
अशी झाली शेकरुची प्रगणना
अकोले तालुक्यातील राजूर-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील झाडाना क्रमांक देऊन झाडावर क्रमांक टाकण्यात आला. तसेच जीपीएस रीडिंग घेत शेकरुच्या त्या झाडावरील अधिवासाबाबतचे निरीक्षण वनपाल, वनरक्षक, वनमजूरांकडून नोंदविण्यात आले. राजूर वनपरिक्षेत्रातील तीनही वनपरिमडाळात सुमारे दहा ते पंधरा दिवस गणना घेण्यात आली. पाच घरटे म्हणजे एक शेकरूचे वास्तव्य याप्रमाणे मोजदाद केली गेली.

