महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यासंदर्भात पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. मंगळवारी रात्री पोलीस प्रशासनाने दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल ४३ जिवंत गोवंश जनावरे कत्तली होण्यापूर्वीच वाचविली आहेत. विशेष म्हणजे यातील एका कारवाईत जिवंत गोवंश जनावरांनी आरडाओरडा करू नये, यासाठी कत्तलखाना चालकाने गोवंश जनावरांच्या तोंडाला काळ्या रंगाच्या चिकटपट्ट्या चिकटविण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात दोघा कत्तलखाने चालकांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित सन १९९५ कलम ५, ९(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध कायदा कलम ३, ११ प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विवेक दत्तू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिली कारवाई शहरातील भारत नगरमध्ये करण्यात आली. पोलीस पथकाने मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास भारत नगर मधील सुफियान कुरेशी यांच्या वाड्यात छापा टाकला असता तेथे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांना १६ गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवले असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी सुमारे एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यासंदर्भात राजीक मुनीर शहा (रा. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अजित बाळकृष्ण कुऱ्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसऱ्या कारवाईमध्ये आरोपी राजिक रज्जाक शेख (रा. भारत नगर, संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक नऊमध्ये कारवाई केली.
या कारवाईत एका पत्र्याच्या शेडमध्ये २७ जिवंत वासरांच्या तोंडाला काळ्या चिकटपट्ट्या लावून त्यांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवले असल्याचे समोर आले. या कारवाईत पोलिसांनी एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

