महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात सेवा, समर्पण आणि गरीबाच्या कल्याणासाठी काम झाल्याने भारत वेगाने विकासाच्या दिशेने जात आहे. सर्व समाजाचा विकास आणि उन्नती करण्याचे स्वप्न केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार साकारीत आहे. सरकारची नऊ वर्षातील ही कामगिरी सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन हिमाचल प्रदेशचे प्रभारी तथा चंदिगड प्रदेश अध्यक्ष संजय टंडन यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल @9 अभियानांतर्गत शिर्डीमध्ये ‘सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्ती भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टंडन बोलत होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, संयोजक नितीन कापसे शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यावेळी उपस्थित होते.
टंडन म्हणाले, केंद्र सरकारचा नऊ वर्षाचा कार्यकाल हा सेवा, समर्पण आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. काँग्रेसच्या काळात गरीबी हटावचा नारा दिला होता मात्र गरीबी हटली नाही, असा टोला लगावत या सरकारने 41 कोटीहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले. देशातील अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत थेट खात्यामध्ये लाभ झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार कल्याणकारी योजना राबवित आहे डीबीटी द्वारे 28 लाखांहून अधिक लाभार्थी हस्तांतरित केले 80 कोटीहून अधिक लोकांना मोफत अन्न पुरवले. लसीचे 2.2 अब्ज डोस उपलब्ध करून देण्यापासून ते जगातील सर्वात कमी मृत्यूदरापैकी एक आणि अर्थव्यवस्था व्यवस्थापित करण्यापासून ते जगातील सर्वात वेगात वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून देश उदयास येत आहे.
स्वदेशी लस भारतातच बनविली गेली. पंतप्रधान मोदींनी शस्त्रास्त्र विक्रेत्यांकडून खरेदी बंद केली संरक्षण उपकरणे भारतातच बनवायला सुरुवात केली असल्याचे टंडन म्हणाले.
महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले, केंद्रातील सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने जात असताना सर्व समाजाचा विकास आणि उन्नती होण्याचे स्वप्न साकारत आहे. मोदी देशाला भवितव्य दाखविणारे नेते आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे केवळ देशातच नव्हे तर परदेशातील भारतीय नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” हा मोदी सरकारचा मंत्र, भारतीयांची अस्मिता आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने काम सुरू केले असल्याचे ते म्हणाले.
सूत्रसंचालन योगीराज परदेशीं यांनी तर आभार जिल्हा संयोजक नितीन कापसे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

