महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा जूनला सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चाच्यावेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चितावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्चाच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुदर्शन चॅनलचे संपादक व भगवा मोर्चातील प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांच्यासह योगेश मनोहर सूर्यवंशी व विशाल भगवान वाकचौरे यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भगवा मोर्चासाठी प्रशासनाकडून अटी, शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. बजरंग दलाच्या विशाल भगवान वाकचौरे यांच्यासह इतरांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या मोर्चाचे रूपांतर शेवटी सभेत झाले होते. मोर्चामध्ये 18 ते 20 हजारांचा जनसमुदाय सहभागी झाला होता. सभा संपल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
सभेदरम्यान योगेश सूर्यवंशी आणि सुरेश चव्हाणके यांनी प्रक्षोभक भाषणे केली असल्याचे तक्रारीत म्हटले असून प्रशासनाने या भाषणांचा बारकाईने अभ्यास करत संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये गुन्हा दाखल झालेल्यांनी जातीय दंगा घडवून आणण्याकरिता बेछूटपणे, बेदरकारपणे चितावणी देणारे भाषणे करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या परवानगीमधील अटी, शर्ती व सर्वोच्च न्यायालयाने याचिकेद्वारे निर्गमित केलेल्या न्याय निर्णयाचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.
या सभेचे सूत्रसंचालन आरएसएसचे अक्षय उर्फ ज्ञानेश्वर थोरात यांनी केले होते. प्रस्तावना एकलव्य आदिवासी संघटना व बजरंग दलाचे योगेश सूर्यवंशी यांनी केली तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कुलदीपसिंह ठाकुर यांनी निवेदन वाचन केले होते.
जोर्वेनाका घटनेनंतर संगमनेर शहर व तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटने पाठोपाठ जोर्वे व समनापुर येथे या घटनेचे पडसाद उमटले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमनेरात ठाण मांडल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तब्बल तीन आठवड्यानंतर जोर्वे नाका घटनेतील आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
मोर्चानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या घराजवळील जाणता राजा मैदानावरील रस्त्यावर देखील थोरात यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर उशिराने यासंदर्भात गुन्हा दाखल केल्याचे बोलले जाते.

