महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य पाठोपाठ आता मुंबईत आणखी एका तरुणीची निर्घून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह आढळल्याने मुंबई महिलांसाठी असुरक्षित बनल्याचे समोर येत आहे.
मुंबईच्या वरळी सी फेसवर एका गोणीमध्ये हातपाय-तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अशा पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपीने केला. या तरुणीचे वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान वरळी पोलिसांनी अज्ञाता विरोधात या युवतीच्या हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या आधी श्रद्धा वालकर, सरस्वती वैद्य यांच्या हत्या प्रेम संबंधातून झालेल्या वादातून झाल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा देखील प्रकार समोर आला होता. महिलांवरील गुन्ह्यांमुळे मुंबई महिलांसाठी असुरक्षित बनली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान ही तरुणी कोण तिचा खून कोणी आणि कशासाठी केला याची उकल करण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

