महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत मंत्रीपदी आरुढ झालेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचे कारण स्पष्ट करताना “आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजप-शिंदे गटाच्या साथीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात ‘शिंदे-फडणवीस-पवार’ सरकार सत्तेत आल्यानंतर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या आज मुंबईत बैठका पार पडल्या.
या पार्श्वभूमीवर मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदार आणि समर्थकांच्या मेळाव्यामध्ये मंत्री भुजबळ बोलत होते.
यावेळी भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी आपल्याला अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचे सांगत आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये सध्या बिनकामाच्या बडव्यांची मोठी गर्दी झाली असल्याने यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे.

