महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – शुक्रवारी (ता. 7 जुलै) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावात एक नंबर कांद्यास सर्वाधिक 1801 रुपयांचा तर टोमॅटो 1400 रुपये प्रति कॅरेट बाजार भाव मिळाला आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बाजार समितीमध्ये आपला माल विक्रीस आणत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.
गुंजाळ म्हणाले, शुक्रवारच्या लिलावामध्ये बाजार समितीत एकूण 26444 कांदा गोण्यांची आवक झाली. या लिलावामध्ये चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1801 रुपयांचा, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 900 रुपयांचा भाव मिळाला. तर गोल्टी कांदाही 400 ते 800 रुपये भावाने विकला गेला.
बाजार समितीमध्ये टोमॅटोचीही मोठ्या प्रमाणात आवक झाली. 14200 कॅरेट टोमॅटोची तर 1672 कॅरेट डाळिंबाची आवक झाली आहे. एक नंबर डाळिंबास प्रति किलो 175 ते 250 रुपये, दोन नंबर डाळिंबास 121 ते 151 रुपये व तीन नंबर डाळिंब मालास 100 ते 111 रुपयांचा भाव मिळाला आहे.
संगमनेर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमाला चांगला बाजार भाव मिळत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणण्याचे आवाहन सचिव सतीश गुंजाळ व सभापती शंकर खेमनर यांनी केले आहे.

