महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केल्यानंतर राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले.
माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले, राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या विरोधात अधिक कठोर कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या पावसाळी अधिवेशनातच अशा विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा अस्तित्वात आणणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. थोरात यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विशेष समिती स्थापन केल्याचा उल्लेख केला होता.
ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

